Monday, August 10, 2026

Jharkhand : झारखंडमध्ये झामुमो - काँग्रेस सरकारचा विद्यार्थ्यांवर लाठीमार

Jharkhand : झारखंडमध्ये झामुमो - काँग्रेस सरकारचा विद्यार्थ्यांवर लाठीमार

रांची : विद्यार्थ्यांशी चर्चा करा, त्यांच्यावर कठोर कारवाई करणे टाळा असे आवाहन एक्स पोस्ट करून संसदेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केले. पण काँग्रेसच्याच पाठिंब्यावर सत्तेत असलेल्या झारखंडच्या हेमंत सोरेन सरकारने या आवाहनाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या. झारखंडमध्ये झामुमो - काँग्रेस सरकारने रात्री विद्यार्थ्यांवर लाठीमार केला. लाठ्या चुकवण्यासाठी पळापळ करत असलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनी यांचा पाठलाग करून त्यांच्यावर जोरदार लाठीमार करण्यात आला. यानंतर मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आले. विद्यार्थी आंदोलनाचे नेतृत्व करत असलेल्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन थेट रुग्णालयात दाखल केले.

 
View this post on Instagram
 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

विद्यार्थ्यांची यथेच्छ धुलाई करून झारखंडच्या पोलिसांनी आंदोलकांना पळवून लावले. याआधी पाण्याचे फवारे, अश्रूधूर अशा विविध मार्गांनी विद्यार्थ्यांचे आंदोलन मोडीत काढण्याचे प्रयत्न झारखंड सरकारने केले. यामुळे काँग्रेसचा दुतोंडी कारभार जगजाहीर झाला आहे.

नीट पेपरफुटीनंतर अनेकांना अटक झाली. विद्यार्थ्यांना परीक्षा फी परत मिळाली. यानंतर एनटीएने त्यांच्याकडे असलेल्या निधीतून फेरपरीक्षेचे आयोजन केले. विद्यार्थ्यांना विनामूल्य फेरपरीक्षा देण्याची संधी मिळाली. चोख बंदोबस्तात झालेल्या फेरपरीक्षेचा निकाल जाहीर झाला. यानंतर अचानक दिल्लीत नीट पेपरफुटीचा निषेध करत शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी काही तरुणांनी आंदोलन केले. पोलीस बळाचा वापर होऊ नये यासाठी काँग्रेसने आंदोलकांना न मागता पाठिंबा दिला. यानंतर राहुल गांधींच्या नेतृत्वात स्वतंत्र आंदोलन करण्याचा प्रकार झाला. केंद्र सरकारने सर्वांशी चर्चा केली आणि परिस्थिती शांतपणे हाताळली. काही दिवसांतच संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये पेपरफुटी विरोधी कठोर शिक्षेची तरतूद असलेले विधेयक सादर झाले. दोन्ही सभागृहांमध्ये हे विधेयक मंजूर झाले. केंद्र सरकारने यानंतरही तरुणाईशी संवाद सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी झारखंडमध्ये वेगळेच चित्र दिसू लागले.

झारखंड सरकारच्या अखत्यारित असलेल्या स्पर्धा परीक्षांमधील गैरप्रकारांविरोधात राज्यातील तरुणाईने आंदोलन सुरू केले. या आंदोलनाला बळाचा वापर करून झारखंड सरकारने मोडीत काढले. पण काँग्रेसने सोरेन सरकारचा पाठिंबा कायम ठेवला आहे. दुसरीकडे केंद्र सरकारने दिल्लीतले विद्यार्थी आंदोलन, नीट पेपरफुटी आदी मुद्यांवर संसदेत चर्चेला तयार असल्याचे जाहीर केले आहे. पण काँग्रेसने चर्चेआधी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीच राजीनामा द्यावा, अशी नवी भूमिका मांडायला सुरुवात केली आहे. केंद्र सरकारने या मुद्यांवर आता थेट संसदेतच बोलू अशी स्पष्ट भूमिका घेतली आहे.

झारखंडमध्ये विद्यार्थ्यांना चोपले

झारखंडमध्ये तरुणाईचे आंदोलन मोडून काढण्यासाठी बॅरिकेड्स, ब्लेड लावलेल्या काटेरी तारांचे कुंपण, पाण्याचे फवारे, अश्रूधूर, लाठीमार अशा विविध मार्गांचा कठोरपणे वापर करण्यात आला. पोलीस बळाचा वापर करून आंदोलकांची धुलाई करण्यात आली. काळोखाचा फायदा घेत पोलिसांनी आंदोलकांवर जोरदार लाठीमार केला. पोलीस कारवाईच्या या दणक्यापुढे आंदोलकांचा निभाव लागला नाही. आता पोलीस कारवाईचा निषेध म्हणून मंगळवार ११ ऑगस्ट रोजी झारखंड बंदची हाक देण्यात आली आहे. झारखंडमधील भाजपने सोरेन सरकारच्या कारवाईचा निषेध करत बंदची घोषणा केली आहे. मंगळवारी सकाळी आठ वाजल्यापासून बंदला सुरुवात होणार असल्याचे भाजप नेते बाबूलाल मरांडी यांनी जाहीर केले आहे. JPSC - PT सह मागील सात वर्षांत झारखंड सरकारच्या अखत्यारित झालेल्या सर्व स्पर्धा परीक्षांमधील गैरप्रकारांची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी भाजपने केली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >