मुंबई : मुंबईत रुग्णसंख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत काही अनावश्यक गोष्टींवर निर्बंध लावावे लागतील. महापालिकेच्या वतीने काही कडक निर्बंध लागू शकतात. मुंबईत जीवनावश्यक वस्तू सोडून नाईट कर्फ्यू लावता येईल का? याबाबत सध्या विचार सुरू आहे. रात्रीच्या फिरण्यावर, हॉटेलिंगवर निर्बंध आणणे गरजेचे आहे. गरज असल्यास रात्री ११ ते सकाळी ५ वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू लावण्याचा प्रस्ताव आहे, असे संकेत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले.
राज्यातील ६० लाख मुलांचे लसीकरण करायचे आहे. दररोज ३ लाख मुलांचे लसीकरण याप्रमाणे प्रयत्न करत आहोत. १५ ते २० दिवसांमध्ये हे लसीकरण होऊन जाईल. किशोरवयीन मुलांना स्वत: सुरक्षित राहायचे असेल, कुठे जायचे असेल तर लसीकरण करुन घ्या. बर्गर आणि पिझ्झा घ्यायचा असला तरी लस बंधनकारक केली आहे. त्यामुळे लसीकरण करुन घ्या, असे आवाहन राजेश टोपे यांनी किशोरवयीन मुलांना केले आहे.
कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत धार्मिक स्थळ पूर्णपणे बंद होती. पण, नवरात्रीच्या मुहूर्तावर मंदिरे उघडण्यात आली होती. आता पुन्हा कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे धार्मिक स्थळं आणखी बंद होतील का? अशी भीती आहे. त्याबाबत राजेश टोपे यांनी स्पष्टीकरण दिले असून सर्वच धार्मिक स्थळांवर गर्दी टाळावी लागेल. सर्वत्र गर्दी टाळण्याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. आपल्याला कडक लॉकडाऊन करायचे नाही. पण, गर्दी होऊ नये यासाठी राज्य सरकार आग्रही आहे, असे राजेश टोपे म्हणाले.