बॅलेट पेपरबाबतच्या सर्व याचिका फेटाळत सुप्रीम कोर्टाचा निर्णय
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायलयात (Supreme Court) गेल्या अनेक दिवसांपासून निवडणुकांसाठी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन म्हणजेच ईव्हीएमचा (EVM) मुद्दा चर्चेत होता. निवडणुकीत गैरप्रकार रोखण्यासाठी बॅलेट पेपरवर (Ballot Paper) निवडणुका व्हाव्यात अशा याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. मात्र, अशा निवडणुका घेणं शक्य नसल्याचं सांगत सर्वोच्च न्यायालयाने या सर्व याचिका फेटाळल्या आहेत. शिवाय ईव्हीएमवरच मतदान (Voting) होईल, असा निर्णय दिला आहे.
इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या मुद्द्यावरुन सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरु होती. इव्हीएममध्ये नोंद झालेल्या १०० टक्के मतांची व्होटर व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल म्हणजेच व्हीव्हीपॅटमधील (VVPAT) पावत्यांशी पडताळणी करुन पाहण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, बॅलेट पेपरबाबतच्या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. त्यामुळे EVM मशीनवरच निवडणुका होणार आहेत, असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.
सर्वोच्च न्यायालयाने आधी सांगितलं होतं की, बॅलेट पेपरवर निवडणुका घेणे अवघड आहे. EVM मशीन आणि VVPAT यांच्या पडताळणीची मागणी केली होती, त्याबाबत निर्देश देऊन ते सुधारण्याची प्रक्रिया राबवली जाऊ शकते, असं न्यायलयाने सांगितलं होतं.
सर्वोच्च न्यायालयाने दोन निर्देश दिले आहेत – पहिला निर्देश म्हणजे चिन्ह लोडिंग प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, सिम्बॉल लोडिंग युनिट्स (SLU) सील केले जावे आणि ते किमान ४५ दिवस ते ठेवावे. याशिवाय दुसरा निर्देश म्हणजे अभियंत्यांची टीम मायक्रोकंट्रोलर युनिटची जुनी मेमरी तपासेल.