पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप व शिंदे यांच्या गटाच्या शिवसेनेशी युती करण्याच्या घटनेला काही महिनेच झाले असताना लोकसभेनंतर विधानसभा निवडणूक होणार आहे. मात्र या दरम्यान महायुती टिकून राहावी, अशी मी देवाकडे प्रार्थना करतो,असे वक्तव्य अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी करून खळबळ उडवून दिली आहे.
मावळ लोकसभेत महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि माजी राज्यमंत्री बाळा भेगडेंसमोर शेळके यांनी हे वक्तव्य केले आहे. याबरोबरच महायुतीकडून बारणे यांचा प्रचार योग्य रित्या सुरु आहे का? याबाबत ही शेळकेंनी प्रश्न उपस्थित केले. तसेच मला ढकलून देण्याचे नियोजन करणाऱ्यांच्या खाली मी देखील सुरुंग लावून ठेवल्याचे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजपला ही डिवचले आहे. सुनील शेळके यांच्या या वक्तव्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.
माझ्या आमदारकीच्या काळात मी जे भोगले आहे, ते पुढच्या पंचवीस वर्षात कोणाला अनुभवता येणार नाही, असे म्हणून गेल्या पाच वर्षातील फोडाफोडीचं राजकारण आपल्याला अजिबात आवडले नाही, असेही शेळके यांनी बोलून दाखवले. बारणेंच्या प्रचारात शेळके यांनी हे वक्तव्य केल्यामुळे महायुतीत समन्वय राखला गेलाय का? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
मावळ लोकसभा मतदार समघातून उमेदवारी देण्यासाठी सुनील शेळके यांनी आपला विरोध दर्शवला होता. मतदारसंघातील पक्षाच्या ताकदीवर दीड लाखाच्या फरकानेउमेदवार निवडून येईलम असा उमेदवार मावळमध्ये असल्याचेही ते म्हणाले होते. त्यानंतर शेळके त्यांच्या प्रचारात सहभागी होणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागले होते. मात्र अजित पवारांच्या आदेशामुळे शेळके बारणेंच्या प्रचारात सक्रिय झाले. अजित पवार आमचे सर्वेसर्वा आहेत. त्यांनी जी भूमिका घेतली, त्या भूमिकेसोबत आम्ही ठामपणाने उभे राहणार आहोत, असेही शेळके म्हणाले. महायुतीचा धर्म फक्त राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी पाळावा, असे नाही तऱ शिवसेना, भाजप यांनीदेखील युतीचा धर्म पाळला पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे.
एकुणच भाजप आणि शिंदे गट यांच्यासोबत अजित पवार यांनी केलेली युती शेळके यांना पटलेली दिसत नाही आणि श्रीरंग बारणे यांच्यासोबत आता जाणूनबूजून जुळवून घ्यावे लागत असल्याचे शेळके यांच्या वक्तत्व्यावरून वाटत आहे.