भाजपा आमदार नितेश राणे यांचा घणाघात
कणकवली : मुख्यमंत्री होण्याअगोदरचा चैत्यभूमीवर अभिवादन करतानाचा उद्धव ठाकरे व त्यांच्या कुटुंबियांचा एक तरी फोटो दाखवा. हाकेच्या अंतरावर असलेल्या महापौर बंगल्यावर तासनतास बसण्यास वेळ होता. पण कधी चैत्यभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना नतमस्तक होऊन अभिवादन करायला वेळ मिळाला नाही. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्या अडीच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय तिथे गेले. अन्यथा ते कधीही गेले नाहीत. याचे कारण देखील त्यांनी सांगावे. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल काय विचार आहेत? हे सुध्दा जाहीर करावे. अन्यथा आम्ही पुराव्यासकट उघडे पाडू, अशी टीका भाजपा आमदार नितेश राणे यांनी केली.
संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल असलेल्या सन्मानाबद्दल बोलू नये. आणि शक्य असेल तर संजय राऊत यांनी त्यांचे मालक उद्धव ठाकरे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर काय होते? आणि त्यांनी संविधान कसे घडवलं ? याबद्दल थोडा लेक्चर द्यावा आणि मगच सकाळचे मनोरंजन करावं, असा टोलाही आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत,उद्धव ठाकरेंना लगावला.
पुढे संजय राऊत यांनी पंतप्रधानांवर केलेल्या टीकेला उत्तर देताना,आ. नितेश राणे म्हणाले, पत्राचाळमधील मराठी माणूस तुम्हाला तरी माफ करणार आहे का?, मराठी माणसाचा आत्मा तुम्ही केव्हा शांत करणार. कारण तुमच्यामुळे त्यांना बेघर होण्याची वेळ आलेली आहे. ती मराठी माणसं नाहीत का? असा सवाल उपस्थित करत संजय राऊत यांच्या टीकेला प्रतिटोल्यातून आ.नितेश राणे यांनी उत्तर दिले. त्यामुळे पत्राचाळ मध्ये राहणाऱ्या मराठी माणसाबद्दल थोडी चिंता व्यक्त करा, बोलाआणि मगच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मराठी माणसाच्या नात्याबद्दल बोलण्याची हिंमत करा,असा इशारा देखील आ. नितेश राणे यांनी संजय राऊत यांना दिला आहे.