Tuesday, May 7, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखग्रामपंचायतींचा कल; पुन्हा एकदा भाजपच नंबर वन

ग्रामपंचायतींचा कल; पुन्हा एकदा भाजपच नंबर वन

लोकसभा, विधानसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती यश मिळाले त्याची आकडेवारी निवडणूक आयोगाकडे असते. या आकडेवारीवरून त्या पक्षाची राजकीय ताकद किती, हे सांगता येते. मात्र ग्रामपंचायतींच्या निवडणुका या पक्षाच्या चिन्हावर लढविल्या जात नाहीत. त्यामुळे कोणत्या पक्षाचे किती सदस्य ग्रामपंचायतीत निवडून आले, हे अधिकृतपणे सांगता येत नसले तरी, प्रत्येक गावात पक्षाचा कार्यकर्ता आणि पदाधिकारी असतो. तो ज्या ठिकाणी प्रचारात उतरतो आणि तो सदस्य जिंकून येतो. त्यातून सर्वसाधारणपणे संबंधित पक्षाकडून आपलाच उमेदवार विजयी झाला असा दावा केला जातो. निवडणूक आयोगाच्या अधिकृत निकालपत्रात कोणत्याही पक्षाचा उल्लेख नसला तरी, ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या निकालानंतर जो राजकीय धुरळा मंगळवारी उडाला, त्यातून प्रत्येक राजकीय पक्षाकडून आपल्याला किती यश मिळाले, हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. या यशातही पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात भाजप नंबर वन ठरला आहे.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत कमळ फुलल्याचा आनंद कार्यकर्त्यांत ओसंडून वाहत होता. त्याचे कारण महाराष्ट्रात ७,७५१ ग्रामपंचायती आणि थेट सरपंचपदासाठी निवडणुका जाहीर झाल्या होत्या, त्यापैकी काही ठिकाणी बिनविरोध झाल्या. तर भाजप-२२४१, शिंदे गट-७७२, ठाकरे गट-६६८, राष्ट्रवादी-१५१२, काँग्रेस-१०३८ या ग्रामपंचायतींमध्ये या पक्षाची सत्ता आली आहे. गाव पॅनेल आणि इतर मिळून १२५५ ग्रामपंचायतींत पक्षविरहित कारभार करण्यात येत आहे. ग्रामपंचायती निकालाचे विश्लेषण केल्यास, पुन्हा एकदा भाजप हाच महाराष्ट्रातील मोठा पक्ष ठरला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील भाजप-बाळासाहेबांची शिवसेना युतीचे सरकार पाच महिन्यांपूर्वी सत्तेवर आल्यानंतर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत पुन्हा एकदा मतदारांनी युतीला कौल दिला आहे. तसेच विरोधी पक्षांच्या एकत्रित संख्येपेक्षा अधिक सरपंच भाजप-बाळासाहेबांची शिवसेना युतीचे निवडून आले आहेत. सत्तांतरानंतर यापूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतही मतदारांनी युतीला पसंती दिली आहे. या निकालामुळे गेल्या चार-पाच महिन्यांत भाजप आणि शिंदे यांच्या गटावर करण्यात आलेल्या विरोधकांच्या आरोपाकडे मतदारांनी कानाडोळा केल्याचे दिसून आले आहे. सर्वोच्च न्यायालयात ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील याचिका घटनापीठाकडे प्रलंबित असल्याने राज्यातील विद्यमान सरकार घटनाबाह्य आहे, असे हिणवण्यात आले आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावरून विरोधकांनी भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळविले या आरोपांची राळ उठवून विरोधकांनी भाजपला महाराष्ट्रद्रोही ठरविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाई झाली. नवाब मलिक आणि अनिल देशमुख हे मंत्री जेलमध्ये गेले तरीही, चोराच्या उलट्या बोंबा विरोधकांनी मारत भाजपला ईडी सरकारच्या नावाने बोलून जनतेमध्ये खराब ईमेज करण्याचा प्रयत्न झाला.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यानंतर ५० खोके एकदम ओकेच्या घोषणा देऊन सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत बिंबविण्याचा प्रयत्न राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या वतीने करण्यात आले. महाविकास आघाडीच्या वतीने राज्यपाल कोश्यारी यांच्या राजीनाम्याच्या मागणीसह इतर मागण्यांसाठी मुंबईत महामोर्चा काढला होता. हा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र निर्मितीच्या वेळी झालेल्या चळवळीतील मोर्चाप्रमाणे विशाल होईल, अशा वल्गना केल्या होत्या; परंतु या मोर्चाकडे राज्यातील जनतेने पाठ फिरवल्यामुळे महाविकास आघाडीचा फज्जा उडाला होता. खरं तर तेव्हाच कल्पना आली होती की, ग्रामपंचायतीच्या निकालात भाजप बाजी मारणार आहे म्हणून. ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये जनतेवर तेथील स्थानिक पदाधिकाऱ्यांचा जेवढा विश्वास तोच पक्ष निकालात बाजी मारतो हे पुन्हा एकदा दिसून आल्याने भाजपची नाळ ही ग्रामीण भागातील जनतेशी आजही जुळलेली आहे, हे सिद्ध झाले आहे. दुसरीकडे गॅस सिलिंडर बाराशेच्या वर गेला आहे. महागाई वाढली आहे, बेरोजगारी वाढली आहे, अशा अनेक मुद्द्यांवर विरोधी पक्षांकडून प्रचारसभेतून भर देत भाजपला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला.

तरीही महाराष्ट्रातील तळागाळातील मराठी मतदारांनी भाजपच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. हे या निकालातून दिसून येते. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश विकासाच्या मार्गावर वेगाने पुढे जात असताना आता महाराष्ट्रातही त्यांच्या विचारांच्या सरकारचे काम राज्यातील जनतेला पसंत पडले आहे, हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज नाही. ज्या पद्धतीने राज्यातील ग्रामीण जनतेने ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे-फडणवीस सरकारला पसंती दिली आहे, त्याच पद्धतीने आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतही युती विजयी होईल यात शंका वाटत नाही. तसेच महानगरपालिका, नगरपालिका निवडणुकीत शहरी मतदारही भाजप-बाळासाहेबांची शिवसेना युतीला कौल देईल, याची खात्री आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -