मुंबई: स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिस्तपालन समितीने युवा नेते रविकांत तुपकर यांना दिलेला अल्टिमेटम १५ ऑगस्टला संपला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेतृत्व तसेच तेथील वरिष्ठांबद्दल तुपकर यांनी काही दिवसांपूर्वी आपली जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे पक्षाच्या शिस्तपालन समितीने रविकांत तुपकर यांना आपले मत मांडण्यासाठी १५ ऑगस्टपर्यंत अल्टिमेटम दिला होता. हा अल्टिमेटम आता संपला आहे.
काही दिवसांपूर्वी पक्षातील वरिष्ठ नेत्यांबाबत तुपकर यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी नाव न घेता राजू शेट्टींच्या कार्यपद्धतीवर टीका केली होती. जे पदाधिकारी पक्षासाठी आपले आयुष्य वेचतात त्यांना न विचारता पदावरून त्यांची हकालपट्टी केली जाते. असा आरोप रविकांत तुपकर यांनी केला होता. प्रसारमाध्यमांसमोर त्यांनी आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली होती.
जाहीरपणे पक्षनेतृत्वावर तसेच वरिष्ठांवर टीका करणारे तुपकर स्वाभिमानी संघटनेतून वेगळे होणार की काय अशा चर्चाही रंगल्या होत्या. ते स्वाभिमानी पक्षातून वेगळे होणाऱ असल्याचेही बोलले जात होते. तुपकर यांनी पक्षनेतृत्व तसेच कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करणार १० पानांचे पत्र राजू शेट्टींना पाठवल्याचेही सांगितले गेले होते. मात्र या पत्रात काय लिहिले होते हे अद्याप समजलेले नाही. मात्र त्यांनी आपली भूमिका माध्यमांसमोर मांडली होती.
तुपकर यांच्या नाराजीनंतर पक्षाने त्यांना १५ ऑगस्टपर्यंत शिस्तपालन समितीसमोर आपले म्हणणे मांडण्यासाठीचा अल्टिमेटम दिला होता. मात्र दिलेल्या तारखेपर्यंत तुपकर समितीसमोर हजर न राहिल्याने हा अल्टिमेटम आता संपला आहे. त्यामुळे स्वाभिमानी पक्ष आता पुढे काय पाऊल उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच तुपकरांच्या या वागण्यामुळे स्वाभिमानी पक्षही फुटणार की काय असा सवाल निर्माण झाला आहे.
उभारणार तरूणांची फौज
दरम्यान, शेतकरी माझा आत्मा आहे. शेवटच्या श्वासापर्यंत मी त्यांच्यासाठी लढत राहीन. मला शेतकरी संघटनेतच राहून काम करायचे आहे असे तुपकरम म्हणाले. तसेच मी इतर कोणत्याही पक्षात जाणार नाही. चळवळीत राहून काम करीन. मला शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लढणाऱ्या तरूणांची फौज उभी करायची आहे असेही तुपकर म्हणाले.