Thursday, May 9, 2024
Homeक्रीडा‘प्ले-ऑफ’ प्रवेशासाठीची रेस

‘प्ले-ऑफ’ प्रवेशासाठीची रेस

आज रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु विरुद्ध पंजाब किंग्जमध्ये घमासान

मुंबई (प्रतिनिधी) : अगदी योग्य वेळी विजयी मार्ग सापडलेला रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु संघ आतापर्यंत असातत्यपूर्ण प्रदर्शन करणाऱ्या पंजाब किंग्जवर विजय नोंदवून प्लेऑफ रेसमधील स्थान आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न करेल. दुसरीकडे कागदावर एक मजबूत संघ असूनही पंजाब सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात अपयशी ठरला आहे. त्यामुळे आता ‘अभी नही तो कभी नही’ म्हणत अधिक उशीर होण्यापूर्वी तसेच प्लेऑफच्या शर्यतीत अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांनी आता सातत्य राखत जिंकण्याच्या दृष्टीने पाऊल उचलणे गरजेचे आहे.

बंगळूरुने गेल्या दोन सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी केली असून त्यांना योग्य मार्ग सापडलेला दिसून येत आहे. विराट कोहली वगळता त्यांचे सर्व फलंदाज उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत. कर्णधार फाफ-डू-प्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल आणि दिनेश कार्तिक यांच्यासोबत अनकॅप्ड रजत पाटीदार आणि महिपाल लोमरोरही चांगली कामगिरी करत आहेत. कोहलीसाठी यंदाचा आयपीएल हंगाम चांगला गेला नाही. पण तो पंजाबविरुद्ध त्याची भरपाई करण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल. जोश हेझलवूड आणि हर्षल पटेल यांच्यासह बंगळूरुचे इतर गोलंदाजही सातत्याने चांगली कामगिरी करत आहेत. मोहम्मद सिराज त्याच्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये नसला तरी त्याच्याकडून महत्त्वाच्या वेळी चांगली कामगिरी करण्याची संघाला अपेक्षा आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुने यंदाच्या या मोसमात आतापर्यंत १२ सामने खेळले आहेत, त्यापैकी त्यांनी सात जिंकून ५ गमावले आहेत. बंगळूरु १४ गुणांसह गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर आहे, तर पंजाब ११ पैकी पाच सामने जिंकून १० गुणांसह आठव्या क्रमांकावर आहे…त. शुक्रवारी जिंकल्यास बंगळूरुचे १६ गुण होतील, परंतु प्ले-ऑफसाठी १८ गुण मिळविल्यास ते खात्रीलायकरीत्या अंतिम चारमध्ये पोहोचतील.

दुसरीकडे, पंजाबचे तीन सामने बाकी आहेत, त्यांना टॉप-फोरमध्ये स्थान मिळवण्यासाठी सर्व सामने जिंकणे आवश्यक असले, तरीही अंतिम चारमध्ये पोहोचण्याची खात्री नाही. हंगामाच्या सुरुवातीला पंजाबने बंगळूरुवर मोठ्या २०५ धावसंख्येचा पाठलाग करताना ५ विकेट्सने विजय मिळवून २०८ धावा करत आपल्या मोहिमेची विजयी सुरुवात केली होती. हाच विजयी कित्ता याही सामन्यात गिरवण्याचा प्रयत्न असेल; परंतु या हंगामात त्यांना सलग दोन सामने जिंकता आलेले नाहीत, ही वस्तुस्थिती त्यांची स्पर्धेतील विसंगत कामगिरी दर्शवते.

शिखर धवन आणि भानुका राजपक्षे यांनी चांगली फलंदाजी केली असून लियाम लिव्हिंगस्टोन आणि जितेश शर्माकडून योग्य साथ देण्याची अपेक्षा आहेत. जॉनी बेअरस्टोला धवनसोबत डावाची सुरुवात करण्यासाठी बढती मिळाल्यानंतर अखेर धावा करण्यात यश मिळाले आहे. कर्णधार मयंक अग्रवाल, ज्याने स्वत:ला क्रमवारीत खाली आणले आहे, त्यालाही धावा करणे आवश्यक आहे. गोलंदाजीत आघाडीचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने १८ विकेट्स घेण्याची चांगली कामगिरी केली आहे; परंतु षटकात सरासरी ९ धावा दिल्या आहेत. अर्शदीप सिंग विशेषत: डेथ ओव्हर्समध्ये उपयुक्त ठरत आहे आणि त्याच्या यॉर्कर टाकण्याच्या क्षमतेने अनेकांना प्रभावित केले आहे. संदीप शर्माही पॉवरप्लेमध्ये काही विकेट्स घेणारा गोलंदाज आहे.

ठिकाण : ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई. वेळ : रात्री ७.३० वाजता.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -