नवी मुंबई (प्रतिनिधी) : कोणत्याही बस थांब्यावर खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनाला प्रतिबंध आहेत. या प्रकारचे नियम परिवहन विभागाने लागू केले आहेत. या प्रकारचा नियम असतानाही खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर तसूभरही फरक पडल्याचे जाणवत नसल्याचे वास्तवदर्शी चित्र नवी मुंबई शहरातील महत्त्वाच्या मार्गावर दिसून येत आहे. यामुळे शासकीय व पालिकेच्या परिवहन उपक्रमाला दररोज लाखो रुपयांचा फटका बसत आहे.
खासगी वाहने थेट बस थांब्यावरच आक्रमण करत असल्याने शासकीय प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण होत आहे. यामुळे प्रवासी नाराजी व्यक्त करत आहेत. ठाणे-बेलापूर महामार्गावर प्रवाशांची रेलचेल मोठ्या प्रमाणात असते. या मार्गावर स्थानिक परिसरात प्रवाशांना सेवा देण्यासाठी नवी मुंबई महानगपालिकेच्या परिवहन विभागाच्या बसेस धावत असतात, तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे बेस्ट उपक्रम प्रवासी सेवा देत आहे.
दोन्हीही पालिकेच्या बसेस शहरभर मोठ्या प्रमाणात धावत असतात; परंतु उपलब्ध असणाऱ्या सर्वच थांब्यावर नियमबाह्य रिक्षाचालक थांब्यावर दबा धरून प्रवासी उचलण्याचा प्रकार नियमित चालू आहे. याचा फटका दोन्हीही परिवहन उपक्रमाला बसत आहे. तसेच शासनाच्या एसटी परिवहन सेवेस देखील बसत आहे.
अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या विविध वाहनांवर नियमित कारवाई करण्यात येत असते. कारवाईत सातत्य ठेवून पुढेही अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जाईल. – हेमांगिनी पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी.