Thursday, May 9, 2024
Homeक्रीडाएका वर्षात दोनवेळा ‘आयपीएल’!

एका वर्षात दोनवेळा ‘आयपीएल’!

मुंबई (प्रतिनिधी) : यंदा आयपीएलचा ज्वर चांगलाच चढला होता. कोरोनाच्या संकटानंतर पहिल्यांदाच चाहत्यांना स्टेडियममध्ये जाऊन सामने पाहण्याचा आनंद घेता आला. काही दिवसांपूर्वीच आयपीएल संपते न संपते तोच एका गोष्टीची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. ही चर्चा आहे एकाच वर्षात दोन आयपीएल खेळवायची. एकाच वर्षात दोन आयपीएल स्पर्धा कशा खेळवल्या जातील, याचा फॉर्म्युलाही पुढे आला आहे. त्याचबरोबर सामने कसे खेळवायचे, हेदेखील स्पष्ट करण्यात आले आहे.

या वर्षी आयपीएलमध्ये बरेच बदल करण्यात आले होते. मोठा बदल म्हणजे यावेळी आयपीएलचा मेगा लिलाव करण्यात आला आणि त्यानंतर सर्व संघांची ओळखच बदलल्याचे पाहायला मिळाले. कोणत्या संघात कोणते खेळाडू आहेत, हे समजायला थोडा वेळ गेला, पण त्यानंतर त्यामधली रंगत चांगलीच वाढली.

त्याचबरोबर या आयपीएलमध्ये दोन नवीन संघांची एंट्री झाली, त्यामुळे आयपीएलमध्ये या वर्षी एकूण १० संघ खेळले. त्याचबरोबर सामन्यांची संख्याही वाढली. पण आता आयपीएल स्पर्धा एका वर्षात दोनदा खेळवायची असेल तर त्यासाठी भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी एक योजना सांगितली आहे. शास्त्री म्हणाले की, ‘ट्वेन्टी-२० क्रिकेटचे सामने किंवा स्पर्धा या फुटबॉलच्या धर्तीवर खेळायला हव्यात.

फुटबॉलमध्ये दोन देशांमध्ये मालिका खेळवल्या जात नाहीत, तर लीग आणि विश्वचषक खेळवला जातो. त्याप्रमाणे ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या दोन देशांमध्ये होणाऱ्या मालिका बंद करायला हव्या. त्यानंतर ट्वेन्टी-२० सामने हे आयपीएलसारख्या लीग्स आणि फक्त विश्वचषकात खेळवायला हवेत. त्यानुसार एका वर्षात दोनदा आयपीएल होऊ शकते. एका वर्षात १४० सामने होतील, जे ७०-७०मध्ये विभागले जाऊ शकतात. त्यामुळे एका वर्षात दोनदा आयपीएल खेळवणे सोपे होऊ शकते.

‘आयपीएल संपल्यावर आता भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ट्वेन्टी-२० मालिका होणार आहे. या मालिकेपूर्वी भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी काही मोठी वक्तव्ये केली आहेत. त्यामधील हे एक मोठे वक्तव्य आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -