मुंबई: हार्दिक पांड्या वनडे वर्ल्डकप २०२३दरम्यान दुखापतग्रस्त झाला होता. भारताच्या या ऑलराऊंडरला बांगलादेशविरुद्धच्या सामन्यादरम्यान दुखापत झाली होती. हा सामना १९ ऑक्टोबरला खेळवण्यात आला होता. आता मैदानावर त्याचे पुनरागमन झाले आहे. यामुळे आयपीएल २०२४ आधी मुंबई इंडियन्स आणि टी-२० वर्ल्डकप २०२४आधी भारतीय क्रिकेट संघासाठी मोठी दिलासादायक बाब आहे. हार्दिकने डीवाय पाटील टी-२० स्पर्धेच्या माध्यमातून तब्बल चार महिन्यांनी पुनरागमन केले आहे.
स्पर्धेत हार्दिक रिलायन्स १चे नेतृत्व करताना दिसला. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडविरुद्ध खेळवल्या गेलेल्या सामन्यात हार्दिकने बॅटिंग आणि बॉलिंग दोन्ही केली. पहिल्यांदा बॉलिंग करताना त्याने ३ षटकांत २२ धावा देत २ विकेट मिळवल्या. हार्दिकने रिलायन्स १ साठी बॉलिंगची सुरूवात केली.
त्याने पुन्हा बॅटिंग करताना ४ बॉलमध्ये नाबाद ३ धावा केल्या. विशेष म्हणजे हार्दिक १०व्या स्थानावर बॅटिंगसाठी उतरला होता. हार्दिकच्या टीमने १५ षटकांत ८ बाद १२६ धावांचे लक्ष्य गाठले होते. पांड्याच्या बॅटिंग आणि बॉलिंग करण्याने एक गोष्ट तर स्पष्ट झाली की तो पूर्णपणे फिट आहे. तो आयपीएल आणि आगामी टी-२० वर्ल्डकपमध्ये तो पूर्ण क्षमतेने खेळू शकतो.
हार्दिकच्या अनुपस्थितीत सूर्याने केले होते नेतृत्व
हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादवने भारतीय टी-२० संघाचे नेतृत्व केले होते. हार्दिक गेल्या काही वर्षांपासून भारतीय टी-२० संघाचे नेतृत्व करत होता. मात्र त्याच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादवने वर्ल्डकपनंतर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळवल्या गेलेल्या मालिकेत भारताचे नेतृत्व केले होते. दरम्यान, अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेत रोहित शर्मा भारताचा कर्णधार म्हणून दिसला होता.