Tuesday, May 26, 2026

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या मनधरणीसाठी फडणवीसांचे शिलेदार मैदानात !

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या मनधरणीसाठी फडणवीसांचे शिलेदार मैदानात !

- जागावाटपाचा तिढा सुटणार? वर्षा बंगल्यावर मध्यरात्री दोन तास खलबते

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या विधान परिषदेच्या १६ जागांसाठी निवडणूक जाहीर होताच सत्ताधारी महायुतीमधील राजकीय समीकरणांना वेग आला आहे. जागावाटपाच्या मुद्द्यावरून महायुतीतील घटक पक्षांमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू असल्याचे चित्र असून, विशेषतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची नाराजी दूर करण्यासाठी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरसावले आहेत. शिंदे यांची नाराजी दूर करत महायुतीत सुवर्णमध्य साधण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाजपच्या दोन अत्यंत विश्वासू नेत्यांवर महत्त्वाची जबाबदारी सोपवल्याचे सूत्रांकडून समजते.

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी सोमवारी मध्यरात्री एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. सुमारे दोन तास चाललेल्या या बैठकीत विधान परिषदेच्या जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी सविस्तर चर्चा झाली. या चर्चेदरम्यान, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि ठाणे या जागांवरून महायुतीत रस्सीखेच वाढल्याचे समोर आले आहे.

शिवसेना (शिंदे गट) काही जागांवर आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहे. अशावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाराजी नेमकी कोणत्या जागांवरून आहे, हे समजून घेऊन त्यावर जागांची अदलाबदल किंवा समन्वयाचा फॉर्म्युला तयार करण्याचे आदेश या दोन्ही नेत्यांना देण्यात आले आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुणे मतदारसंघाच्या जागेवरून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तीव्र असंतोष आहे, तर नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरच्या जागेवरून शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप आमनेसामने येण्याची शक्यता आहे. ठाणे हा एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असल्याने तिथल्या जागेवर ते 'धक्कातंत्र' वापरण्याच्या तयारीत आहे. अशा परिस्थितीत भाजपने मित्रपक्षांना सोबत ठेवतानाच जागावाटपात स्वतःचा वरचष्मा कसा राखायचा, यासाठी ही रणनीती आखली आहे.

आज 'वर्षा'वर होणार बैठक

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्यामुळे गेल्या दोन-अडीच वर्षांपासून या जागा रिक्त होत्या. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, २५ मे रोजी अधिसूचना जारी झाली असून १ जूनपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. १८ जून रोजी मतदान तर २२ जून रोजी मतमोजणी होणार आहे. या मर्यादित वेळेत महायुतीतील अंतर्गत धुसफूस शमवणे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरील मोठे आव्हान असणार आहे. मंगळवारी सायंकाळी 'वर्षा'वर होणाऱ्या महायुतीच्या मुख्य बैठकीत यावर अंतिम तोडगा निघण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >