Monday, May 25, 2026

Beed Murder News : बीडमध्ये तरुणाची अमानुष हत्या; दोरीने बांधून बेदम मारहाण!

Beed Murder News : बीडमध्ये तरुणाची अमानुष हत्या; दोरीने बांधून बेदम मारहाण!

बीड : मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर बीड (Beed) जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. मात्र, त्यानंतरही जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या घटना थांबण्याचे नाव घेत नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. बीड शहरात एका दारूच्या दुकानावर काम करणाऱ्या तरुणाला दोरीने बांधून अमानुष मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या क्रूर मारहाणीत संबंधित तरुणाचा मृत्यू झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उमेश दळवी असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून तो बीड शहरातील रहिवासी होता. अत्यंत गरीब कुटुंबातील असलेल्या उमेशने एका दारूच्या दुकानात काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवला होता. सोशल मीडियावर (Social Media) सध्या व्हायरल होत असलेल्या छायाचित्रांमध्ये (Images) उमेशच्या चेहऱ्यावर, पाठीवर तसेच हात-पायांवर गंभीर मारहाणीच्या खुणा दिसत आहेत. आरोपींनी उमेशला दोरीने बांधून बेदम मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत आहे.

या घटनेनंतर उमेश दळवीचा मृतदेह आढळून आला. विशेष म्हणजे, मारहाण होण्यापूर्वी उमेशने आपल्या पत्नीला फोन करून जीवाला धोका असल्याची माहिती दिली होती. "मला या ठिकाणी मारणार आहेत," असे त्याने पत्नीला फोनवर सांगितल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

"मला मारणार आहेत", उमेशचा पत्नीला शेवटचा फोन

मृत उमेश दळवी यांच्या पत्नीने अनेक धक्कादायक खुलासे केले. त्यांनी सांगितले की, "माझा नवरा गेल्या दोन वर्षांपासून त्या दारूच्या दुकानावर काम करत होता. घटनेच्या दिवशी रात्री सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास त्यांनी मला फोन करून सांगितले की, मला मारणार आहेत. त्या वेळी मी घरी एकटीच होते. अगदी किरकोळ कारणावरून त्यांना मारहाण करण्यात आली. याआधीही त्यांनी अशाच प्रकारच्या धमक्यांविषयी मला सांगितले होते."

पोलिसांनी तक्रार घेतली नाही; पत्नीचा गंभीर आरोप

उमेशच्या पत्नीने पोलिसांवरही गंभीर आरोप केले आहेत. "मी याआधी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले होते. मात्र, माझी तक्रार नोंदवून घेतली गेली नाही. जर व्यवसायात काही आर्थिक घोळ झाला असेल, तर आम्हाला सांगायला हवे होते. आम्ही पैसे परत केले असते. पण माझ्या नवऱ्याचा जीव घेण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला. याशिवाय, "आमचे सर्व पैसे घेतले. शेतजमिनीचे पैसे घेतले. माझ्या मालकीची संपत्तीही त्यांनी बळकावली आहे," असा गंभीर आरोपही उमेश दळवी यांच्या पत्नीने केला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >