Friday, May 1, 2026

Mumbai News : कलिंगड खाल्ल्यामुळे नाही तर यामुळे गेले संपूर्ण कुटुंबाचे प्राण; फॉरेन्सिक रिपोर्ट आला समोर

Mumbai News : कलिंगड खाल्ल्यामुळे नाही तर यामुळे गेले संपूर्ण कुटुंबाचे प्राण; फॉरेन्सिक रिपोर्ट आला समोर

मुंबई : पायधुनी परिसरात एका कुटुंबातील चौघांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने मुंबई हादरली होती. सुरुवातीला कलिंगड खाल्ल्याने अन्नातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र आता समोर आलेल्या फॉरेन्सिक अहवालामुळे या प्रकरणाला पूर्णपणे नवे आणि गंभीर वळण मिळाले आहे.

फॉरेन्सिक तपासणीत मृतांच्या शरीरातील अंतर्गत अवयवांमध्ये असामान्य बदल दिसून आले आहेत. मेंदू, हृदय आणि आतडी यांचा रंग बदलून हिरवट झाल्याचे निदर्शनास आले आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, असा बदल सामान्य अन्नविषबाधेत दिसत नाही आणि हा अत्यंत विषारी रासायनिक घटकाचा परिणाम असू शकतो. मात्र या अहवालाला अद्याप अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.

याशिवाय, मृतांपैकी अब्दुल्ला यांच्या शरीरात मॉर्फिन या शक्तिशाली वेदनाशामक औषधाचे अंश आढळल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. मॉर्फिन हे साधारणतः कॅन्सर किंवा शस्त्रक्रियेनंतर तीव्र वेदना कमी करण्यासाठी वापरले जाणारे औषध आहे. त्यामुळे एका सामान्य कुटुंबातील व्यक्तीच्या शरीरात हे औषध कसे आले, याबाबत मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

सुरुवातीला कलिंगडामुळे झालेल्या विषबाधेचा संशय होता, मात्र मॉर्फिनचा शोध लागल्यानंतर हा अपघात आहे की घातपात, याबाबत पोलिसांचा संशय अधिक गडद झाला आहे. पोलिसांनी आता कलिंगड विक्रेता, अन्न सेवनाचा तपशील तसेच कुटुंबाचा वैद्यकीय इतिहास या सर्व बाजूंचा सखोल तपास सुरू केला आहे.

दरम्यान, फॉरेन्सिक अहवालात नमूद करण्यात आलेल्या अंतर्गत अवयवांच्या रंगबदलावर तज्ज्ञांकडून अधिक अभ्यास सुरू आहे. प्राथमिक निष्कर्षांनुसार, हे प्रकरण साध्या अन्नविषबाधेपेक्षा अधिक गुंतागुंतीचे असल्याचे दिसून येत आहे.

या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून तपास यंत्रणांसमोर अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. पोलिस आता या प्रकरणाचा प्रत्येक पैलू तपासत असून लवकरच सत्य समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >