Monday, August 10, 2026

Devendra Fadnavis : 'एफसीआरए' विधेयकामुळे अमेरिकेतील काहींना मिरची का लागली?

Devendra Fadnavis : 'एफसीआरए' विधेयकामुळे अमेरिकेतील काहींना मिरची का लागली?

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; हे विधेयक कोणत्याही धर्माच्या किंवा समुदायाच्या विरोधात नाही

मुंबई : केंद्र सरकारच्या प्रस्तावित 'फॉरेन कंट्रीब्युशन रेग्युलेशन ॲक्ट' अर्थात 'एफसीआरए' दुरुस्ती विधेयकावरून होत असलेल्या आंतरराष्ट्रीय टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. "या विधेयकामुळे अमेरिकेतील काहींना मिरची का लागली आहे, यावरूनच भारताला असा कायदा आणण्याची नेमकी काय गरज आहे हे स्पष्ट होते," असे फडणवीस म्हणाले. तसेच हे विधेयक कोणत्याही एका विशिष्ट धर्माच्या किंवा समुदायाच्या विरोधात नसून, देशविरोधी कृत्यांसाठी परदेशी निधीचा होणारा गैरवापर रोखणे हाच यामागील मुख्य उद्देश असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

नागपूर येथे माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, देशात एफसीआरए कायद्याचा गैरवापर करून काही संस्थांकडून परदेशातून प्रचंड निधी आणला जात आहे आणि या पैशांचा वापर भारतविरोधी कारवायांसाठी केला जात असल्याचे उघड झाले आहे. ही बाब देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर आहे. ज्या संस्था प्रामाणिकपणे समाजोपयोगी आणि चांगले काम करत आहेत, त्यांच्यासाठी या विधेयकात कोणतीही अडचण किंवा त्रास नाही. ज्या संस्था नियमानुसार कामाचा आणि पैशांचा पारदर्शक हिशेब देतील, त्यांचे परवाने सुरक्षित राहणार आहेत.

अमेरिकेतून या कायद्यावर सातत्याने येत असलेल्या वक्तव्यांचा खरपूस समाचार घेताना ते म्हणाले की, हा भारताचा संपूर्णपणे अंतर्गत विषय आहे. तरीही अमेरिकेतील काही घटकांना या दुरुस्ती विधेयकाची मिरची लागली आहे, यावरूनच या कायद्याची राष्ट्रीय गरज अधोरेखित होते. केंद्र सरकार अत्यंत संवेदनशील आणि सर्वांचे ऐकून घेणारे सरकार आहे. संसदेत यावर सविस्तर चर्चा होऊ शकते. एफसीआरए विधेयक ख्रिश्चन संस्थांपुरते मर्यादित नसून, परदेशातून निधी मिळवणाऱ्या प्रत्येक धर्माच्या आणि समाजाच्या संस्थेला लागू आहे. त्यामुळे याला धार्मिक रंग देणे चुकीचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (Devendra Fadnavis)

दरम्यान, स्वातंत्र्य दिन आणि ९ ऑगस्टच्या 'भारत छोडो' आंदोलनाच्या स्मृती सप्ताहानिमित्त भाजपतर्फे राज्यात काढल्या जाणाऱ्या तिरंगा रॅलीबाबत विचारले असता मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात देशभक्तीची लाट निर्माण झाली आहे. स्वातंत्र्यदिनी देशाप्रती निष्ठा आणि प्रेमाचे वातावरण अधिक दृढ व्हावे, यासाठी या रॅलींचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईतील तिरंगा रॅलीत सहभाग घेतल्यानंतर उद्या पुण्याच्या रॅलीत आणि १४ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर येथील रॅलीचे स्वतः नेतृत्व करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. (Devendra Fadnavis)

शरद पवार गटाचे खासदार पंतप्रधानांना भेटण्यात गैर काय?

शरद पवार गटाच्या आठ खासदारांनी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची भेट घेतल्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले, "ही अतिशय चांगली गोष्ट आहे. पंतप्रधान हे संपूर्ण देशाचे असतात, ते एका पक्षापुरते मर्यादित नसतात. मी स्वतः मुख्यमंत्री असल्याने अनेक विरोधी पक्षाचे लोक मला भेटत असतात आणि आपापल्या मतदारसंघातील कामे सांगत असतात. लोकप्रतिनिधींनी पंतप्रधानांना भेटून राज्याचे प्रश्न मांडणे ही लोकशाहीतील एक उत्तम प्रक्रिया असून याकडे कुठल्याही राजकीय अथवा वेगळ्या दृष्टीने पाहण्याचे कारण नाही," असे त्यांनी स्पष्ट केले. (Devendra Fadnavis)

गडचिरोली सर्पदंश घटनेची चौकशी :

- गडचिरोली जिल्ह्यातील एका आश्रमशाळेत सर्पदंशाने तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याच्या घटनेवर मुख्यमंत्री म्हणाले की, या घटनेची गांभीर्याने दखल घेण्यात आली असून, याबाबतचा सविस्तर अहवाल आणि माहिती प्रशासनाकडून मागवण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. - त्याचप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीच्या पंचनाम्यांवर बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, यंदा कोणीही बागायतदार किंवा जिरायतदार शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही. यासाठी मानवी हस्तक्षेपाऐवजी 'गूगल इमेजरी', प्रत्यक्ष 'ग्राउंड ट्रुथिंग' आणि 'ड्रोन इमेजरी' या अत्यंत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. त्यामुळे कोणत्याही पात्र शेतकऱ्याचे नुकसान लपून राहणार नाही आणि जे शेतकरी नियमबाह्य दावे करतील, त्यांना डिजिटल पुराव्यांच्या आधारे पारदर्शकपणे बाजूला केले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >