नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टी-२० विश्वचषक स्पर्धेनंतर विराट कोहलीने टी-२० संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याचे जाहीर केले होते, तर भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळही संपुष्टात आला. शास्त्री-कोहली यांचा कार्यकाळ भारतीय क्रिकेटसाठी लक्षणीय ठरला आहे.
शास्त्री-कोहली यांच्या नेतृत्त्वात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये टी-२० मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. २०१७ साली भारताने श्रीलंकेला ३-० असा क्लीन स्वीप दिला. तसेच पहिल्यांदाच वेस्ट इंडिजमध्ये कसोटी मालिका जिंकताना विंडीजला व्हाईटवॉश दिला. इंग्लंडमध्ये पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी ऐतिहासिक आघाडी घेतली.
इंग्लंडमधील आयसीसी २०१९ विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने उत्तम कामगिरी करत उपांत्य फेरी गाठली. साखळी फेरीत सर्वोत्तम संघ ठरताना भारताने अव्वल स्थान मिळवले; परंतु उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्ध पराभव पत्कारावा लागल्याने भारताला स्पर्धेबाहेर जावे लागले. शास्त्री यांच्या पदाची जबाबदारी घेण्यास राहुल द्रविड सज्ज झाले असून भारताच्या टी-२० संघाच्या नेतृत्त्वाची धुरा रोहित शर्माकडे आली आहे.
कसोटी उपविजेतेपद
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचे आव्हान मोडून काढत भारतीय क्रिकेट संघाने यावर्षी झालेल्या पहिल्या वहिल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद (डब्ल्यूटीसी) स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. मात्र, अंतिम सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध ८ गड्यांनी पराभव पत्करावा लागल्याने भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
बॉर्डर-गावसकर ट्रॉफी पटकावली
ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात नमवण्याचा पराक्रम भारतीय संघाने सलग दोनवेळा केला. शास्त्री-कोहली यांच्या मार्गदर्शनात टीम इंडियाने २०१८-१९मध्ये सर्वप्रथम बाजी मारली. ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकणारा भारत पहिला आशियाई देश ठरला. यानंतर २०२०-२१ सत्रात पुन्हा भारताने कांगारुंना त्यांच्याच देशात धूळ चारली. यावेळी पहिला कसोटी सामना खेळल्यानंतर कोहलीने माघार घेतली. मात्र शास्त्री यांचे मार्गदर्शन आणि अजिंक्य रहाणेचे शांत नेतृत्व या जोरावर भारताने सलग दुसऱ्यांदा कांगारुंचा पराभव करून बॉर्डर-गावसकर ट्रॉफी पटकावली.