काँग्रेसकडून राज्यघटनेत ८०वेळा बदल
भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांचा पलटवार
मुंबई : लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election 2024) दक्षिण गोव्याचे काँग्रेसचे उमेदवारांनी गोव्याला भारतीय संविधान लागू करू नये असे म्हटले होते. तर कर्नाटकातही अशाच प्रकारचे वक्तव्य केले होते. दुसरीकडे भाजपाला (BJP) संविधान बदलायचे आहे. म्हणून, ४०० पारचा नारा दिला जात आहे, असा दावा राहुल गांधी करतात. परंतु, काँग्रेसने आतापर्यंत ८० वेळा संविधान बदलले आहे. यावरून त्यांना राज्यघटनेविषयी आदर नसल्याचे स्पष्ट झाले आहे, असा पलटवार भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि भाजपावर टीका करण्यासारखे काहीच उरले नसल्याने राज्यघटना बदलासाठी भाजपला ४००पेक्षा अधिक जागा हव्या आहेत, असा अपप्रचार काँग्रेसचे नेते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे हे करत आहेत,’ असा आरोप तावडे यांनी केला. ‘मोदी सरकारच्या कार्यकाळात संविधान दिवस साजरा केला जाऊ लागला, भाजपाचे संकल्पपत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी प्रसिद्ध झाले. यावरून भाजपचा डॉ. आंबेडकर आणि राज्यघटनेबद्दलचा आदर स्पष्ट झाला आहे,’ असे चोख प्रत्युत्तर तावडे यांनी दिले.
राज्यातील प्रचाराच्या घसरलेल्या पातळीबाबत तावडे यांनी चिंता व्यक्त केली. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, बाळासाहेब ठाकरे, विलासराव देशमुख, शरद पवार हे नेतेही परस्परांवर टीका करीत असत. मात्र, त्या वेळी प्रचाराची पातळी घसरत नव्हती, याकडे त्यांनी लक्ष वेधले. महायुतीतील पक्षांना आपापल्या ताकदीप्रमाणे जागा मिळतील,’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मोदी सरकारच्या काळात महाराष्ट्राला भरघोस यश मिळाले.
‘यूपीए’ सरकारच्या तुलनेत केंद्राकडून महाराष्ट्राला मिळालेल्या अनुदानात २५३ टक्क्यांनी वाढ झाली, करांच्या परताव्यापोटी मिळणाऱ्या रकमेत ३३ टक्के वाढ झाली. २०२०-२०२१ पासून ११ हजार ७११ कोटी रुपये बिनव्याजी कर्ज मिळाले, पंतप्रधान आवास योजनेंतर्गत राज्यात शहरी आणि ग्रामीण भागांत २७ लाख घरे बांधली गेली, असे त्यांनी सांगितले.मोदी सरकारच्या गेल्या दहा वर्षांच्या कार्यकाळात महाराष्ट्राला भरभरून मिळाले आहे, असे सांगताना तावडे यांनी याचा लेखाजोखाच दिला.
महायुतीला भरभरून मतदान होईल’
महाराष्ट्रात आयुष्मान भारत योजनेचे अडीच कोटी लाभार्थी आहेत, राज्यात जनधन योजनेत ३ कोटी ४२ लाख खाती उघडली गेली. मुद्रा योजनेत महाराष्ट्रात दोन लाख ३३ हजार कोटी रुपये कर्जवाटप झाले, राज्यात आठ लाख विक्रेत्यांना स्वनिधी योजनेत कर्ज मिळाले. ७५ लाख जणांच्या घरात जलजीवन योजनेद्वारे पाणी मिळाले. अशा अनेक गोष्टींचा विचार करून मतदार भाजप आणि महायुतीला भरभरून मतदान करतील, असा विश्वास या वेळी तावडे यांनी यावेळी व्यक्त केला.