उद्धव ठाकरे व संजय राऊत यांना उद्देशून नितेश राणे यांचा घणाघात
मुंबई : संजय राऊतने औरंग्याची तुलना आमचे आदरणीय पंतप्रधान मोदी साहेब आणि भारतीय जनता पक्षाच्या नेतेमंडळींसोबत केली. पण औरंग्याचे सगळे गुण संजय राऊत आणि त्याच्या मालकाने घेतले आहेत. छत्रपती शिवरायांनी ज्या पद्धतीने औरंग्याच्या विरोधात माताभगिंनींना वाचवलं, हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्याच पद्धतीने गेल्या दहा वर्षांत मोदी सरकारच्या नेतृत्वात माताभगिनींकडे बघण्याची कोणी हिंमत केली नाही. औरंग्याच्या कबरीच्या बाजूला आम्ही दोन खड्डे खणायला सुरुवात केली आहे. ४ जूनपर्यंत ते खड्डे तयार होतील आणि मग औरंग्याच्या वृत्तीच्या या दोन कार्ट्यांना आम्ही महाराष्ट्राच्या मातीतच गाडू शकतो, हे जनतेसह पुढच्या पिढीलाही कळेल, असा घणाघात भाजपा आमदार नितेश राणे यांनी केला. महिलांचा अनादर करणार्या संजय राऊतांना नितेश राणे यांनी खडे बोल सुनावले.
नितेश राणे म्हणाले, डॉ. स्वप्ना पाटकर यांनी काल नीलम गोर्हे ताई यांच्याकडे जाऊन संजय राजाराम राऊत आपल्याला छळत असल्याची, मागे माणसं लावल्याची तक्रार केली. महाराष्ट्रातील एक महिला अशा पद्धतीने संजय राऊतबद्दल भीती व्यक्त करत असेल, तर माझं पोलीस खात्याला विचारणं आहे की, असे महिलांना छळणारे, त्यांना खुलेआम धमक्या देणारे लोकांमध्ये जाऊन प्रचार कसा करतायत? उद्या अन्य माताभगिंनींसोबत असे प्रकार झाले तर त्या घराबाहेर पडणं बंद करतील. आम्ही ऐकलं आहे की चंबळमध्ये डाकू फिरायचे तेव्हा महिला घराबाहेर यायच्या नाहीत. तसंच उद्या संजय राऊत फिरायला लागला तर माताभगिनी घराबाहेर येणार नाहीत, अशी टीका नितेश राणे यांनी केली.
नितेश राणे संजय राऊतांना उद्देशून म्हणाले, केंद्रीय मंत्री असताना नारायण राणे साहेबांनी काय दिवे लावले हे जर तुला बघायचेच असतील तर आमची अपेक्षा होती की तू रत्नागिरी- सिंधुदुर्गमध्ये प्रचारासाठी येशील. कारण इथल्या जनतेला राणे साहेबांची कामं चांगलीच माहित आहेत आणि त्याचं उत्तर येत्या ४ जूनला तुला मिळेल.
विनायक राऊत मविआचा उमेदवार की फक्त उबाठाचा?
विनायक राऊत महाविकास आघाडीचा उमेदवार आहे की फक्त उबाठाचा? कारण आज प्रचाराचा शेवटचा दिवस असताना संपूर्ण प्रचारयंत्रणेत तुझा मालक आणि त्याचा पेंग्विन सोडून राष्ट्रवादी शरद पवार गट किंवा काँग्रेसचा एकही बडा नेता प्रचाराला का आला नाही? ज्यांचे तळवे तुम्ही चाटता त्यांपैकी कोणीच का आलं नाही? त्यामुळे मविआच्या नेत्यांनाही खात्री झाली आहे, की ७ मे ला विनायक राऊतला काही मतदान मिळणार नाही, निकाल महायुतीच्या बाजूने लागणार आहे, असं नितेश राणे म्हणाले.
प्रकल्पांना विरोध करुन खंडणीच्या पैशांवर ते जगतात
प्रकल्पांना विरोध का होत आहे, हे राज साहेबांनी समजून घेतलं पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले. यावर नितेश राणे म्हणाले, राज साहेबांना जेवढं प्रकल्पाचं महत्त्व समजतं तेवढं संजय राऊत आणि त्याच्या मालकाला समजत नाही. याचं कारण असं आहे की, राजसाहेब तोडपाणी करत नाहीत. पण उद्धव ठाकरे आणि संजय राऊतचं आयुष्यच तोडपाणीवर चालू आहे. प्रत्येक प्रकल्पासाठी यांचे रेटकार्ड तयार आहेत. प्रकल्पांना विरोध करुन खंडणीच्या पैशांवर ते जगतात, असा आरोप नितेश राणे यांनी केला.
भांडुपमध्ये बसून मान-अपमानाच्या गोष्टी करु नयेत
राज ठाकरे यांनी कोकणात जाऊन अपमान केला, असंही संजय राऊत म्हणाले. यावर नितेश राणे म्हणाले, आता अपमान आणि मान कसा राखला जातो, हे मुंबई आणि भांडुपमध्ये बसून कळणार नाही. भांडुपला बरीच कोकणी जनता राहते. त्यांना जाऊन राज साहेबांनी कोकणात येऊन केलेल्या करिष्माबद्दल विचारलं असते, तरी यांना कळलं असतं. ज्या वॉर्डमध्ये हा राहतो, तिथे तो निवडून येऊ शकला नाही, त्यामुळे भांडुपमध्ये बसून मान-अपमानाच्या गोष्टी करु नयेत, असं नितेश राणे म्हणाले.