Saturday, May 11, 2024
Homeताज्या घडामोडीहत्या करुन पळून जाणाऱ्या महिलेसह तीन परप्रांतीयांना २४ तासाच्या आत अटक

हत्या करुन पळून जाणाऱ्या महिलेसह तीन परप्रांतीयांना २४ तासाच्या आत अटक

देवा पेरवी

पेण : पेण तालुक्यातील वडखळ येथील सावली लॉजचे व्यवस्थापक धर्मेंद्र कुशवाह याची गळा चिरून व लिंग छाटून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्येमुळे वडखळ परिसर व पेण तालुक्यात एकच खळबळ उडाली होती. मात्र पोलिसांनी पळून जाणाऱ्या महिलेसह तीन परप्रांतीयांना २४ तासाच्या आत अटक केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पेण तालुक्यातील वडखळ येथील सावली लॉजचे व्यवस्थापक धर्मेद्र कुशवाह यांची लॉजच्या रूम नं. ११५ मध्ये अज्ञात व्यक्तीने मंगळवारी रात्री उशिरा धारदार शस्त्राच्या सहाय्याने गळा कापून हत्या केली होती. तसेच त्याचे गुप्तांग कापून त्याच्या डोक्यावर, डोळ्यावर ठेवण्याचा धक्कादायक प्रकार केला होता. या हत्येची माहिती मिळताच पेणचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी फडतरे, वडखळ पोलीस निरीक्षक पांढरे यांनी तात्काळ घटना स्थळाला भेट देवून घटनेची पाहणी केली होती.

त्यानंतर पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, पोलीस उपनिरीक्षक विशाल शिर्के, सपोनि संदीप पोमण, पोलीस उपनिरीक्षक धनाजी साठे, चव्हाण यांचे पथक तयार केले. या पथकाने सदर आरोपींचे मोबाईल नंबर मिळवले मात्र सदर मोबाईल फोन बंद ठेवण्यात आले होते. मात्र त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता पेण व पनवेलकडे जाणा-या महामार्गावर वाहनांची तपासणी सुरु केली. त्यावेळी हत्या करणारे आरोपी पेण येथे वाहन बदलून एसटी बसने पनवेलकडे जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून सदर एसटीचा पोलिसांनी पाठलाग केला. एसटी अडवून चंद्रजीत झंकूराम भारद्वाज, वय-३० वर्षे रा. नवली ता. शाहगंज, जि. जोनपूर, राज्य- उत्तर प्रदेश, हरीशंकर लालचंद राजभर वय-१९ वर्षे रा. सवायन, ता. शहागंज, जि. उत्तर प्रदेश, अंजुदेवी सरोज चौहान वय-३२ वर्षे रा. खलारी, ता. खलारी, जि. रांची, राज्य – झारखंड या तीन आरोपींना उत्तरप्रदेश व झारखंड येथे पळून जात असताना पकडले.

यावेळी मिळालेल्या माहितीनुसार, अंजुदेवी सरोज चौहान हिचे चंद्रजीत भारद्वाज याच्याशी प्रेमसंबंध व लॉजचे व्यवस्थापक धर्मेद्र कुशवाह याच्या बरोबर अनैतिक संबंध होते. धर्मेद्र कुशवाह व चंद्रजीत भारद्वाज यांच्यामध्ये एक आठवड्यापूर्वी जोरदार भांडणही झाले होते. त्यावेळीच चंद्रजीतने धर्मेंद्र याला ठार मारण्याचा निश्चय केला. त्यासाठी त्याने धारदार चाकूही खरेदी केला. त्याची हत्या करण्याकरिता अंजुदेवी व इतर आरोपी यांनी प्लॅन करून सावली लॉजवर गेले. अंजुदेवी ही व्यवस्थापक धर्मेंद्रला शारीरिक संबंधासाठी रूम नं. ११५ मध्ये घेऊन गेली. त्याच वेळी प्लॅन प्रमाणे चंद्रजीत व हरीशंकर रूममध्ये गेले व रूमचा दरवाजा आतून बंद करून तिघांनी संगनमत करून मयताचे तोंड दाबून खाली पाडून त्याचे छातीवर बसून चाकूने गळा चिरला व त्यानंतर त्याचे लिंग छाटून त्याची निर्घृण हत्या केल्याचे तपासात पोलिसांना कबुली दिली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -