कल्याण : केंद्र शासनाच्या स्मार्टसिटीअंतर्गत चाललेल्या कामांच्या पाहणी दौऱ्याकरिता केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील हे कल्याण पश्चिममध्ये आले असता, त्यांनी सिटी पार्कच्या कामाची पाहणी करून कामाचा दर्जा समाधानकारक नसल्याचे सांगत नाराजी व्यक्त केली.
सिटी पार्कच्या कामाची गुणवत्ता आणि हे काम कोणासाठी आणि कशासाठी आहे, हा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. यावेळी संबंधित ठेकेदार आणि महापालिकेचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी तसेच पालिका अधिकारी यांच्याशी सल्ला-मसलत करून, सिटी पार्कच्या कामाचा दर्जा योग्यरीत्या व्हावा असे निर्देश दिले तसेच संथगतीने काम सुरू असल्याने कामावरही नाराजी व्यक्त केली. तसेच नागरिकांसाठी सिटी पार्क लवकरात लवकर खुला व्हावा, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी त्यांच्यासमवेत माजी आमदार नरेंद्र पवार हे देखील उपस्थित होते.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या मंजूर विकास आराखड्यानुसार टाऊन पार्क व सिटी पार्क विकसित करणे, काळा तलाव व परिसराचे सुशोभीकरण, कल्याण स्टेशन परिसर सुधारणे अशी अनेक कामे सुरू आहेत. या कामांचा आढावा घेऊन त्यांची सद्यस्थिती काय आहे, कामे पूर्ण होण्यास येणारे अडथळे यांची माहिती कपिल पाटील यांनी घेतली.
यावेळी कपिल पाटील यांनी कल्याण रेल्वे स्थानक, भगवा तलाव, सिटी पार्क, वाडेघर सर्कल ते रिंग रोड, बारावे-आंबिवली- टिटवाळा या ठिकाणी पाहणी करून माहिती घेतली. ही कामे वेळेत पूर्ण व्हावीत जेणेकरून आपण मोदीजींच्या स्वप्नातील स्मार्ट शहरे उभारू शकू, अशी सूचना कपिल पाटील यांनी अधिकाऱ्यांना केली.