Monday, May 6, 2024
Homeमहाराष्ट्रपालघरपालघर जिल्ह्याच्या पूर्वेकडील भागात डोंगर होत आहेत भुईसपाट

पालघर जिल्ह्याच्या पूर्वेकडील भागात डोंगर होत आहेत भुईसपाट

अनेक विभागांच्या परवानग्या न घेता काम सुरू

धुळीकणांमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम

सफाळे (वार्ताहर) : पालघर जिल्ह्यातून रायगड-उरणच्या जेएनपीटी ते दिल्ली या डीएफसीसी व मुंबई-बडोदा एक्स्प्रेस, मुबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन आणि विरार-डहाणू उपनगरी तीन व चार अशा जाणाऱ्या प्रकल्पासाठी लागणाऱ्या माती, मुरूम आणि दगडासाठी पालघर जिल्ह्याच्या पूर्वेकडील भागातील जवळपास १५ ते २० डोंगर भुईसपाट करण्याचे काम सुरू आहे. मात्र महसूल विभाग त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. पर्यावरणाला मोठा फटका बसणार असल्याने पर्यावरणप्रेमींनी याबाबत विरोध दर्शवला आहे.

जिल्ह्यातील विशेषतः जंगलपट्टीतील आदिवासी पाड्याजवळ प्रकल्प उभारणाऱ्या कंपनीना मुरूम, माती, दगड पुरविण्याचे काम काही जिल्ह्याबाहेरील तर स्थानिक ठेकेदारांनी सुरू केले आहे. जिल्ह्यात आजच्या घडीला ३५० ते ४०० मोठे (हायवा) ट्रक डोंगर खोदून तेथील माती, मुरूम, दगड या प्रकल्पांसाठी दिवसंरात्र पुरवत आहेत. त्यामुळे अवघ्या चार दिवसांत अर्धा किलोमीटर लांबीचे डोंगर भुईसपाट करण्यात येत आहेत.

युएसएमएल लिमिटेड या कंपनीने सरकारची परवानगी न घेता बेकायदेशीर आरएमसी प्लान्ट आणि क्रशर मशीन सुरू केली आहे. तीन वर्षांपासून सुरू असलेल्या या प्लान्टमुळे प्रदूषण होत असून त्याचा फटका आदिवासी नागरिक, बागायती शेतीला बसतो आहे. पालघर तालुक्यातील सफाळे, गारगांव, किराट, धुकटंण, डहाणू तालुक्यातील वाणगाव आदी भागात मोठे डोंगर जमीनदोस्त होत आहेत. या कामासाठी मोजक्या ठिकाणी परवानगी घेण्यात आली असून बाकी अन्य ठिकाणी परवानगी न घेता महसूल विभागातील अधिकाऱ्यांशी हाताशी धरून काम सुरू आहे. इतकेच नव्हे तर वनखात्याचे डोंगर जेसीबी मशीनद्वारे भुईसपाट करण्याचे काम सुरू आहे. मात्र वनविभाग त्याकडे डोळेझाक करत आहे.

जेएनपीटी ते दिल्ली दरम्यान पश्चिम रेल्वेला समांतर डीएफसीसी प्रकल्पाचे काम सुरू असून यासाठी लागणारे रेडीमिक्स काँक्रिट ग्रीन झोन असलेल्या वाणगाव वाकीपाडा येथील सर्वे क्र.७४ येथील आरएमसी प्लांटमध्ये तयार केले जाते. यासाठी यूएसएमएल लिमिटेडने महसूल, प्रदूषण विभागाची आवश्यक परवानगी घेतलेली नाही.

यूएसएमएल लिमिटेड कंपनीच्या कास्टिंग यार्डमधील आरएमसी प्लांटमधून उडणारे धुळीकण हवेद्वारे आजूबाजूच्या बागायतीमधील पिकांवर बसत असल्याने पिकांची प्रत घसरल्याने शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळत नसून त्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. शेजारील आदिवासी पाड्यातील घरांवर देखील धुळीचे कण पसरून त्याचा लोकांना त्रास होत आहे. गेल्या तीन वर्षांपासून महसूल विभाग,महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची आवश्यक परवानगी न घेताच तसेच तेथे काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षिततेची खबरदारी न घेताच हा प्लान्ट बिनबोभाटपणे सुरू असल्याने वाढत्या प्रदूषणामुळे शेतकरी आणि नागरिक त्रस्त झाले असून या प्लांटवर ताबडतोब बंदीची कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

संबंधित कंपनीची चौकशी करून जर त्यामध्ये काही अनियमितता आढळली तर कंपनीवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात येईल. – अभिजीत देशमुख, तहसीलदार डहाणू.

युएसएमएल लिमिटेड कंपनीच्या वाणगाव येथील आरएमसी प्लांट आणि क्रशर मशीनसाठी महसूल, प्रदूषण नियंत्रणसंबंधित आवश्यक परवानग्या कंपनीकडे आहेत. तसेच शेजारील आदिवासी पाडा आणि शेतीचे नुकसान होत असेल तर त्याची माहिती घेण्यात येईल. – के.के.नायर व्यवस्थापक.

पालघर जिल्ह्यातील केंद्र सरकारचे जे प्रकल्प उभारणीचे काम सुरू आहे, त्यासाठी माती, मुरूम, दगड मिळवण्यासाठी जिल्ह्यातील डोंगर भुईसपाट करण्याचे काम सुरू आहे, यासाठी पर्यावरणीय विभागाची परवानगी घेतली नाही याचा शासनाने खुलासा करावा, तसेच कोणत्या गाव व जमिनीना परवानगी दिली आहे ते प्रसिद्ध करावे. – प्रकाश लवेकर, पर्यावरणीय कार्यकर्ते पालघर.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -