Monday, May 6, 2024
Homeताज्या घडामोडीShocking : मुंबईकरांनो शी.. कसले घाणेरडे पाणी पिताय, हे पहा...

Shocking : मुंबईकरांनो शी.. कसले घाणेरडे पाणी पिताय, हे पहा…

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांवर कचऱ्याचे साम्राज्य

जलवाहिन्यांच्यामध्ये उंदीर, घुशी व मृत जनावरांचे अवशेष

तानसा पाईप लाईन धोकादायक स्थितीत, मुंबईकरांचे आरोग्य धोक्यात

किशोर गावडे

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या चार मोठ्या तानसा पाईप लाईन जलवाहिन्या या धोकादायक स्थितीत (Shocking) असल्याची माहिती समोर आली आहे. भांडुप पश्चिम येथील तुळशेत पाडा, आंब्याच्या भरणी येथील मार्गावरून जाणा-या जलवाहिन्यांवर कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून यात उंदीर, घुशी व मृत जनावरांचे अवशेष असल्याचे दिसून आल्याने मुंबईकरांचे आरोग्य धोक्यात येण्याची दाट शक्यता आहे.

मुंबई महापालिकेच्या एस विभागाने दुर्लक्षित केलेल्या या जलवाहिन्या जीर्ण झालेल्या आहेत. कचरा साचल्याने काही ठिकाणी जलवाहिन्या सडल्या असून त्या फूटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या भल्या मोठ्या जलवाहिन्यांच्या मधल्या भागात ओला कचरा, सुखा कचरा, लाकडी बांबू, प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्या, गोणपाटे, उशी, बिछाने, ताडपत्री, चटई, मोडक्या खुर्च्या, मृत जनावरे, कपाटाच्या फळ्या, सिलिंगचे तुकडे, प्लॅस्टिक बॅरिगेट्स, थर्माकोलचे तुकडे, सॅनिटरी पॅड, लहान मुलांचे डायपर्स, सतरंजी, गोधड्या, चादरी, शूज, तुटलेले पत्रे, कागदाचे लगदे, प्लॅस्टिकच्या पिशव्या तसेच खराब झालेल्या व न वापरात येणाऱ्या वस्तूंचा समावेश आहे.

यावर कोणाचेही नियंत्रण नसल्याने सर्रास हा कचरा जलवाहिन्यांवर टाकून नागरिक निघून जात आहेत. मात्र पालिका प्रशासनाने साफसफाई करण्याचे सौजन्य दाखवलेले नाही.

मोठ्या जलवाहिन्यांवर वर्षानुवर्षे हा कचरा त्याच ठिकाणी पडून राहत आहे. त्यामुळे हळूहळू या कचऱ्याचे ढिगारे तयार होऊ लागले आहेत. हा कचरा कुजून आजूबाजूच्या परिसरात याची दुर्गंधी पसरत असते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

जलवाहिन्यावर मृत जनावरे टाकल्याने हा विभाग बकाल झाला आहे. येथील नागरिकांना श्वसनाचे विकार होऊ लागले आहेत. हे आजार आणखी बळावले जाण्याची शक्यता आहे.

सध्या पावसाळा सुरू असल्याने दैनंदिन कचरा उचलला जात नाही व येथील साफसफाई केली जात नाही. अस्वच्छता पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पालिकेची कोणती यंत्रणाच कार्यरत नाही. त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी ही धोकादायक झाली आहे. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गळती सुरू झाल्याचे दिसून येते. महापालिकेकडून येथील साफसफाई न केल्याने जलवाहिन्या काही प्रमाणात गंजलेल्या आहेत. त्या फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महापालिकेच्या वतीने कचरा टाकण्यासाठी या विभागात ठिकठिकाणी कचराकुंड्याही ठेवण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे कचरा हा उघड्यावर टाकण्याचे प्रकार घडत आहेत. या ठिकाणी दत्तक वस्ती योजनेअंतर्गत काम केले जात आहे. परंतु स्थानिक नागरिकांचा त्या योजनेला प्रतिसाद योग्य तितका दिसून येत नाही. स्वच्छते बाबत स्थानिक लोक जागरूक नाहीत. त्यासाठी अशा प्रत्येक विभागामध्ये जनजागृती करण्याची आवश्यकता आहे.

देश स्वतंत्र होऊन ७६ वर्षात पदार्पण करून देखील मुंबईत अशी काही ठिकाण आहेत ती अजून योग्य तितकी विकसित झालेली दिसून येत नाहीत. येथील नागरिकांना या भागातून ये-जा करताना या दुर्गंधीचा दैनंदिन सामना करावा लागत आहे.

कचरा टाकणाऱ्या व अस्वच्छ करणाऱ्यांना लगाम घालण्यासाठी क्लीन अप मार्शलची मोहीम हाती घेण्यात आलेली नाही. त्यामुळे साफसफाईचा बोजवारा उडालेला आहे.

मनपा प्रशासनाने गांभीर्याने दखल घेत जलवाहिन्या परिसरातील सर्व कचरा मुक्त परिसर करावा, अशी नागरिकांची मागणी आहे.

मोठ्या जलवाहिन्यांमधील कचरा साफसफाई तातडीने केली जाईल. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना पाठवून माहिती घेईन. संपूर्ण जलवाहिनीचा परिसर स्वच्छ केल्यानंतर पुन्हा असा जर प्रकार निदर्शनास आला तर संबंधितांवर कारवाई केली जाईल. – मनोहर शिंदे, सहाय्यक पालिका आयुक्त, एस विभाग

जलवाहिन्यांजवळील असलेला सर्व कचरा हा विखुरला गेलेला आहे. दुर्गंधीने कहर केलेला आहे. पालिका प्रशासनाने तातडीने कारवाई करून तो संपूर्ण विभाग स्वच्छ करावा. – राहुल तारकर, स्थानिक नागरिक

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -