Saturday, August 15, 2026

Virendra Singh Basoya : अमली पदार्थ तस्कर वीरेंद्र सिंग बसोयाला UAE मधून भारतात आणले

Virendra Singh Basoya : अमली पदार्थ तस्कर वीरेंद्र सिंग बसोयाला UAE मधून भारतात आणले

नवी दिल्ली : अमली पदार्थ तस्कर वीरेंद्र सिंग बसोयाला संयुक्त अरब अमिराती अर्थात यूएईमधून भारतात आणण्यात आले आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाने बसोयाला दिल्लीत औपचारिक अटक करून पतियाळा हाऊस न्यायालयात हजर केले. चौकशीसाठी पोलीस कोठडी घेऊन बसोयाला जाब विचारणार असल्याचे संकेत अमली पदार्थ विरोधी पथकाने दिले. याआधी सकाळी बसोयाला पकडून भारतात आणले असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली. भारतात अमली पदार्थांची तस्करी करणारे तस्कर जगात कुठेही लपले असले तरी त्यांना शोधून काढू आणि न्यायालयात हजर करू; असेही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले.

अमित शाह यांनी वीरेंद्र सिंग बसोया प्रकरणी एनसीबीच्या टीमचे अभिनंदन केले. वीरेंद्र सारखे तस्कर आता कुठेही लपले तरी भारतीय कायद्याच्या कचाच्यातून सुटू शकणार नाही, अशी हमी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली. पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केल्याप्रमाणेच देशाला ड्रग मुक्त करण्याच्या हेतूने कारवाई सुरू असल्याची माहिती दिली.

बसोया परदेशात लपून बसला होता. पण आंतरराष्ट्रीय यंत्रणांच्या सहकार्याने भारताने अखेर त्याला पकडले. भारताच्या ड्रग विरोधी धोरणांतर्गत ही कारवाई करण्यात आली.

वीरेंद्र सिंग बसोया हा वीरू, बसोया या वेगवेगळ्या नावांनी ओळखला जायचा. त्याला संयुक्त अरब अमिराती अर्थात यूएईमधून भारतात आणण्यात आले. दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर येताच एनसीबीने वीरेंद्र सिंग बसोयाला औपचारिक अटक केली. यानंतर त्याला दिल्लीच्या पतियाळा हाऊस न्यायालयात हजर करण्यात आले.

याआधी इंटरपोलच्या रेड नोटीसच्या आधारे बसोयाला जून २०२६ मध्ये संयुक्त अरब अमिरातीमध्ये अटक करण्यात आली. भारतीय यंत्रणांनी, संयुक्त अरब अमिरातीच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधून, त्याचे भारतात प्रत्यार्पण सुनिश्चित केले. ही कारवाई एनसीबीच्या "ऑपरेशन ग्लोबल-हंट" अंतर्गत करण्यात आली.

दिल्लीपासून गुजरात, पंजाब आणि परदेशापर्यंत पसरलेल्या सुमारे १३ हजार कोटी रुपयांच्या अमली पदार्थांच्या नेटवर्कचा सूत्रधार म्हणून बसोया काम करत असल्याची माहिती तपास यंत्रणांच्या हाती आहे. याच संदर्भात बसोयाची चौकशी होणार आहे.

कोण आहे बसोया ?

वीरेंद्र बसोया दक्षिण दिल्लीतील पिलंजी गावचा रहिवासी आहेत. त्याचा मुलगा ऋषभ याने २०२३ मध्ये उत्तर प्रदेशातील नोएडाच्या एका माजी आमदाराच्या मुलीशी लग्न केले. हा विवाहसोहळा दिल्ली विमानतळाजवळील एका आलिशान फार्महाऊसवर झाला. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी पुणे पोलिसांनी बसोयाच्या घरावर छापा टाकला. हा छापा पडण्याआधीच वीरेंद्र बसोया आपल्या कुटुंबासह परदेशात पळून गेला होता. अखेर आता त्याला अटक करून भारतात न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >