Tuesday, June 16, 2026

'उबाठा' पुन्हा फुटली; सहा खासदार शिंदेंच्या गळाला

'उबाठा' पुन्हा फुटली; सहा खासदार शिंदेंच्या गळाला

संजय राऊत यांचाही दुजोरा; एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीत दाखल

मुंबई : शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या तोंडावर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय भूकंप झाला आहे. उबाठा गटाच्या एकूण ९ लोकसभा खासदारांपैकी ६ जणांनी बंडाचे निशाण फडकावत दिल्ली गाठली असून, ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. या नाट्यमय घडामोडींची कुणकुण लागताच उबाठाचे मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनीही ट्वीट करत या फुटीला एकप्रकारे दुजोरा दिला आहे. या पार्श्वभूमीवर, बंडखोर खासदारांचा लोकसभेत स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी आणि कायदेशीर सोपस्कार पूर्ण करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः तातडीने दिल्लीत दाखल झाले असून राजधानीतील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उबाठाचे ६ खासदार दिल्लीत सुरक्षित स्थळी पोहोचले असून त्यांच्या स्वाक्षऱ्यांचे अधिकृत पत्रही तयार करण्यात आले आहे. पक्षांतर बंदी कायद्यानुसार कारवाई टाळण्यासाठी दोन तृतीयांश म्हणजेच ६ खासदारांची आवश्यकता असते, हे कायदेशीर गणित सत्ताधाऱ्यांनी अचूक साधले आहे. या बंडखोर गटाला कायदेशीर मान्यता मिळवून देण्यासाठी शिवसेनेचे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव हे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. फुटलेले ६ खासदार बुधवारी सकाळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन स्वतंत्र गटाचे पत्र देण्याची शक्यता आहे.
उबाठा पक्षाच्या एकूण ९ खासदारांपैकी जे ५ खासदार गेल्या 'नॉट रिचेबल' होते आणि ज्यांनी दिल्ली गाठली आहे, त्यांची नावे आता समोर आली आहेत. त्यात संजय जाधव, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, ओमराजे निंबाळकर, संजय दिना पाटील आणि भाऊसाहेब वाकचौरे यांचा समावेश आहे. तर, अनिल देसाई, अरविंद सावंत आणि राजाभाऊ वाजे हे तीन खासदार सद्यस्थितीत उबाठा गटासोबत राहिल्याचे चित्र आहे.
राऊत, सावंत, देसाई दिल्लीत
आपल्या पायाखालची जमीन सरकल्याचे लक्षात येताच उबाठा गोटात कमालीची घबराट पसरली आहे. या संभाव्य फुटीला कायदेशीर आव्हान देण्यासाठी आणि पक्षाची बाजू न्यायालयात मांडण्यासाठी उबाठाचे तीन शिलेदार तातडीने दिल्लीत दाखल झाले आहेत. खासदार संजय राऊत, अरविंद सावंत आणि अनिल देसाई हे दिल्लीत कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेत असून लोकसभा अध्यक्षांसमोर बंडखोरांना अपात्र कसे ठरवता येईल, याची रणनीती आखत आहेत.
'अपना सपना मनी मनी' - संजय राऊत

या राजकीय भूकंपावर उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करत सत्ताधाऱ्यांवर हल्ला चढवला आहे. राऊत यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, "अपना सपना मनी… मनी! महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेण्यासाठी आज रात्री प्रत्येकी १५ कोटी रुपयांचा ॲडव्हान्स देण्यात येत असल्याची माहिती धक्कादायक आणि घृणास्पद आहे!" राऊत यांनी या ट्वीटमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग केले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा