Saturday, June 6, 2026

Chhagan Bhujbal : राज्यसभेसाठी छगन भुजबळ यांचे नाव अंतिम?

Chhagan Bhujbal : राज्यसभेसाठी छगन भुजबळ यांचे नाव अंतिम?

राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; पुतणे समीर यांना राज्य मंत्रिमंडळात घेण्याबाबत झाली चर्चा

मुंबई : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, मंत्री छगन भुजबळ यांचे नाव अंतिम होण्याची दाट शक्यता आहे. राज्यसभेसाठी अचानक भाजप नेत्या नवनीत राणा यांच्या नावाची चर्चा सुरू झाल्याने राष्ट्रवादीच्या गोटात निर्माण झालेली अस्वस्थता दूर करण्यासाठी शनिवारी मुंबईत वेगाने राजकीय घडामोडी घडल्या. राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन भुजबळांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केल्याचे समजते; तसेच छगन भुजबळ दिल्लीत जात असताना राज्यात त्यांच्या रिक्त होणाऱ्या मंत्रिपदावर पुतणे समीर भुजबळ यांची वर्णी लावण्याबाबतही या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सुनेत्रा पवार यांनी बारामती विधानसभा पोटनिवडणूक जिंकल्यानंतर ६ मे २०२६ रोजी आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या या जागेसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार १८ जून रोजी पोटनिवडणूक होत आहे. या जागेसाठी सुरुवातीपासूनच छगन भुजबळ यांचे नाव आघाडीवर होते. मात्र, गेल्या दोन दिवसांत नवनीत राणा यांच्या नावाची चर्चा सुरू झाल्याने तर्कवितर्कांना उधाण आले होते. या पार्श्वभूमीवर शनिवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, खासदार पार्थ पवार आणि स्वतः छगन भुजबळ यांनी 'वर्षा' निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केली. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर हे सर्व नेते भुजबळांच्या निवासस्थानी रवाना झाले, त्यामुळे त्यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब झाल्याचे मानले जात आहे.

समीर भुजबळ यांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाचा प्रस्ताव? छगन भुजबळ केंद्रीय राजकारणात जात असताना, आपल्या वाट्याचे कॅबिनेट मंत्रिपद कुटुंबाबाहेर जाऊ नये, असा शब्द त्यांनी पक्षाकडे मागितला आहे. भुजबळ दिल्लीत गेल्यानंतर राज्यात त्यांच्या आमदारकीच्या आणि मंत्रिपदाच्या जागेवर पुतणे माजी खासदार समीर भुजबळ यांना संधी देण्यात यावी, असा प्रस्ताव राष्ट्रवादीच्या वतीने मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर मांडण्यात आला आहे. भुजबळांच्या या आग्रहाला महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांकडून संमती मिळण्याची शक्यता असून, आगामी राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात समीर भुजबळ यांची थेट कॅबिनेट मंत्री म्हणून वर्णी लागू शकते.

१८ जून रोजी मतदान केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अधिसूचनेनुसार, या राज्यसभेच्या एका जागेसाठी ११ जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असून १८ जून रोजी मतदान आणि त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजता निकाल घोषित केला जाईल. विशेष म्हणजे, याच दिवशी राज्यातील विधानपरिषदेच्या रिक्त जागांसाठीही मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. विधानपरिषदेच्या एकूण १७ जागांपैकी ६ जागांवर महायुतीचे उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आल्यामुळे आता उर्वरित ११ जागांसाठी मतदान होत असून, त्याच दिवशी राज्यसभेचाही फैसला होणार असल्याने १८ जूनचा दिवस राज्याच्या राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >