Saturday, June 6, 2026

Devendra Fadnavis : नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा आग्रह कायम

Devendra Fadnavis : नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा आग्रह कायम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; 'पैशांपेक्षा प्रेमाने माणसे जिंकता येतात' म्हणत सुप्रिया सुळेंना टोला

मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव देण्याबाबत राज्य सरकारचा आग्रह कायम असून, त्यासाठी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी स्पष्ट केले. नवी मुंबई विमानतळ परिसरात अवघ्या आठ महिन्यांच्या विक्रमी कालावधीत उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य आणि देखण्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण शनिवारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते दिमाखात पार पडले. या ऐतिहासिक सोहळ्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी विमानतळाच्या नामकरणावर सरकारची भूमिका अधोरेखित केली.नवी मुंबईसारख्या जागतिक दर्जाच्या विमानतळावर शिवरायांचे हे भव्य स्मारक देश-विदेशातून येणाऱ्या प्रवाशांना महाराष्ट्राचा इतिहास, पराक्रम आणि संस्कृतीची ओळख करून देईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. अवघ्या आठ महिन्यांत हे देखणे स्मारक उभारल्याबद्दल त्यांनी सिडको आणि अदानी एअरपोर्ट लिमिटेडचे विशेष अभिनंदन केले.

दरम्यान, "यापुढे पैशांच्या जीवावर कोणीही निवडून येऊ नये, यासाठी आगामी अधिवेशनात लोकसभेत विशेष विधेयक (बिल) मांडणार," असे विधान राष्ट्रवादी (शप) खासदार सुप्रिया सुळे यांनी केले होते. सुळेंच्या या विधानाचा खरपूस समाचार घेताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "मी एवढेच म्हणेन की, माणसे पैशापेक्षा प्रेमाने जिंकता येतात, हे जर तुम्हाला वेळेत समजले असते, तर असे बिल मांडण्याची आवश्यकताच पडली नसती. तथापि, देशातील निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणि परिवर्तन आले पाहिजे, या मताचा मी देखील आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेत सुधारणा करणारे कोणतेही विधेयक केंद्र सरकार किंवा कोणी लोकप्रतिनिधी आणणार असेल, तर त्यावर सकारात्मक विचार व्हायला हवा, माझी त्याला नक्कीच हरकत नाही."

बाळ मानेंबाबत निर्णय प्रदेशाध्यक्ष घेतील

कोकण स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीतून माघार घेणारे उमेदवार बाळ माने यांच्या भाजप प्रवेशाबाबत विचारले असता फडणवीस म्हणाले, "भाजपमध्ये मुख्यमंत्री निर्णय घेत नाहीत, तर पक्षाध्यक्षांचा निर्णय अंतिम असतो. बाळ माने हे काही आमच्यासाठी परके नाहीत, ते मूळचे भाजपमध्येच घडलेले नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या घरवापसी संदर्भातील अंतिम निर्णय आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हेच घेतील. ते जो निर्णय घेतील, तो आम्हा सर्वांना पूर्णपणे मान्य असेल," असे फडणवीस यांनी नमूद केले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >