Friday, June 5, 2026

Akanksha Chaturvedi Sucide : पेपरफुटीचा मानसिक धक्का; नागपुरातील NEET विद्यार्थिनीने संपवले आयुष्य

Akanksha Chaturvedi Sucide : पेपरफुटीचा मानसिक धक्का; नागपुरातील NEET विद्यार्थिनीने संपवले आयुष्य

नागपूर : NEET परीक्षा पेपरफुटी (Paper Leak) प्रकरणामुळे नागपुरातील १८ वर्षीय विद्यार्थिनी आकांक्षा ऊर्फ स्नेहा कृष्णकुमार चतुर्वेदी हिने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तिच्या मृत्यूनंतर सापडलेल्या सुसाईड नोटमुळे (suicide note) या घटनेला नवे वळण मिळाले आहे. "आई, बाबा मला माफ करा... पुन्हा परीक्षा देण्याचे धाडस माझ्यात नाही," असे तिने चिठ्ठीत लिहून आपल्या आयुष्याचा शेवट केला.

आकांक्षा ऊर्फ स्नेहा कृष्णकुमार चतुर्वेदी ऊर्फ चौबे (वय १८) हिने २० मे रोजी अंबाझरी परिसरातील अजयनगर येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणाचा तपास सुरू असताना तिची हस्तलिखित चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली. या चिठ्ठीत तिने लिहिले आहे, "मी टोकाचे पाऊल उचलत आहे. आई, बाबा मला माफ करा. माझा पहिला NEET पेपर खूप चांगला गेला होता. मला चांगले गुण मिळण्याची खात्री होती. पण आता पुन्हा परीक्षा देण्यासाठी माझे धाडस होत नाही. मी खूप पैसे वाया घालवले. तुमच्यावर दबाव टाकला. मला माफ करा."

देशभरात ३ मे रोजी NEET परीक्षा पार पडली होती. मात्र, नंतर पेपरफुटी (paper leak) प्रकरण उघडकीस आल्यानंतर केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर २१ जून रोजी पुनर्परीक्षा (re-examination) घेण्याची घोषणा करण्यात आली. कुटुंबियांच्या माहितीनुसार, हा निर्णय आकांक्षासाठी मोठा मानसिक धक्का ठरला. तिने पहिल्या परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी केली होती आणि तिला ६५० हून अधिक गुण मिळतील, असा विश्वास होता. मात्र परीक्षा रद्द झाल्यानंतर ती प्रचंड तणावाखाली (stress) गेली होती.

२० मे रोजी दुपारच्या सुमारास आकांक्षाची आई नीलम यांनी तिला जेवणासाठी विचारणा केली. त्यावर "नंतर जेवते" असे सांगून ती आपल्या खोलीत गेली. काही वेळानंतर दुपारी सुमारे तीन वाजता आईने पुन्हा आवाज दिला, मात्र प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर तिचा लहान भाऊ राज याने खिडकीतून पाहिले असता आकांक्षाने ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. कुटुंबियांनी तातडीने तिला रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणी करून तिला मृत घोषित केले. या प्रकरणी अंबाझरी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

आकांक्षाचे वडील कृष्णकुमार चौबे हे कॅटरिंग व्यवसाय करतात. मुलगी डॉक्टर बनावी, हे त्यांचे स्वप्न होते. तिच्या शिक्षणासाठी त्यांनी सुमारे १५ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. याशिवाय किसान क्रेडिट कार्ड (Kisan Credit Card) योजनेअंतर्गत आणखी तीन लाख रुपयांचे कर्ज घेतल्याची माहिती समोर आली आहे. इतकेच नव्हे तर मध्य प्रदेशातील मूळ गावातील शेती आणि घरही गहाण ठेवण्यात आले होते. मुलीच्या शिक्षणासाठी कुटुंबाने मोठा आर्थिक त्याग केला होता.

मात्र आकांक्षाच्या निधनानंतर संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, या धक्क्यातून ते अद्याप सावरू शकलेले नाहीत. आकांक्षाच्या मृत्यूनंतर या प्रकरणाचे पडसाद राजकीय वर्तुळातही उमटले आहेत. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' (X) वर पोस्ट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावर टीका केली.

"नागपूरची विद्यार्थिनी आकांक्षा हिने केवळ आत्महत्या केलेली नाही, तर ती भ्रष्ट आणि मोडकळीस आलेल्या व्यवस्थेची बळी ठरली आहे. शिक्षणमंत्री अजूनही पदावर आहेत. तीच समिती, तोच तपास आणि कोणतीही सुधारणा नाही," असे राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. दरम्यान, NEET पेपरफुटी प्रकरणामुळे विद्यार्थ्यांवर होणारा मानसिक ताण, परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी आणि स्पर्धा परीक्षांच्या पारदर्शकतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >