Friday, June 5, 2026

Kolhapur Accident : मुंबईला जाण्यासाठी निघाले पण त्याआधीच घडला भयंकर अपघात; एका क्षणात संपलं चौघांचं कुटुंब!

Kolhapur Accident : मुंबईला जाण्यासाठी निघाले पण त्याआधीच घडला भयंकर अपघात; एका क्षणात संपलं चौघांचं कुटुंब!

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur Accident) जिल्ह्यातील आजरा तालुक्यात एक भीषण रस्ता अपघात (Road Accident) झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. उत्तुर-बहिरेवाडी मार्गावर दुचाकी आणि आयशर टेम्पो यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत ही दुर्दैवी घटना घडली. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले आहे. मृतांमध्ये दीपक चांदे (३९), त्यांची पत्नी शोभा चांदे (३५), मुलगा जय चांदे (१०) आणि मुलगी पूर्वा चांदे (७) यांचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे कुटुंब मूळचे आजरा तालुक्यातील असले तरी अनेक वर्षांपासून मुंबईत कामानिमित्त वास्तव्यास होते. उन्हाळी सुट्टीसाठी चांदे कुटुंब गावाकडे आले होते. दीपक चांदे यांनी मेहनतीने गावात नवीन घर बांधले होते. घर पूर्ण झाल्यानंतर प्रथमच संपूर्ण कुटुंब काही दिवसांसाठी तेथे राहण्यासाठी आले होते. सुट्टी संपल्यामुळे ते दुसऱ्या दिवशी मुंबईला परत जाणार होते. त्याआधी नातेवाईकांना भेटण्यासाठी दुचाकीवरून दुंडगे गावाकडे निघाले होते.

मात्र, प्रवासादरम्यान त्यांच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या आयशर टेम्पोची जोरदार धडक बसली. धडक इतकी भीषण होती की चौघांचाही घटनास्थळी मृत्यू झाला. अपघातानंतर टेम्पो रस्त्यालगतच्या नाल्यात पलटी झाला.

घटनास्थळी अत्यंत हृदयद्रावक दृश्य पाहायला मिळाले. स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. टेम्पोखाली अडकलेल्या दोन्ही मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागली. अखेर जेसीबीच्या मदतीने टेम्पो बाजूला करून बचावकार्य करण्यात आले.

या दुर्घटनेमुळे चांदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी अपघाताची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >