Tuesday, August 4, 2026

Jalgaon : जळगावात अनधिकृत होर्डिंग्जवर मनपाचा बडगा, नागरिक समित्यांची स्थापना; २४ तासांत कारवाई बंधनकारक

Jalgaon : जळगावात अनधिकृत होर्डिंग्जवर मनपाचा बडगा, नागरिक समित्यांची स्थापना; २४ तासांत कारवाई बंधनकारक

Jalgaon : जळगाव शहरातील अनधिकृत होर्डिंग्ज, बॅनर्स, फ्लेक्स आणि पोस्टर्समुळे शहराचे सौंदर्य बिघडत असून वाहतुकीलाही मोठा अडथळा निर्माण होत आहे. यावर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी आता जळगाव महानगरपालिकेने (Jalgaon Municipal Corporation) प्रभागनिहाय नागरिक समित्यांची स्थापना केली आहे. या समित्या शहरातील अनधिकृत जाहिरात साहित्यावर (Unauthorized advertising material) थेट लक्ष ठेवणार असून, तक्रार आल्यानंतर २४ तासांच्या आत कारवाई करणे संबंधित अधिकाऱ्यांना बंधनकारक करण्यात आले आहे.

विनापरवानगी जाहिरातबाजी थांबवा

उच्च न्यायालयात (High Court) दाखल जनहित याचिकेमधील आदेशाच्या अनुषंगाने ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. महापालिकेची (Jalgaon Municipal Corporation) पूर्वपरवानगी न घेत लावलेले सर्व प्रकारचे जाहिरात साहित्य तत्काळ काढून टाकण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रभागनिहाय समित्यांच्या अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक प्रभाग समितीच्या सूचना फलकावरदेखील प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

...तर थेट उपायुक्तांकडे तक्रार करा

नागरिक समिती किंवा प्रभागातील नागरिकांकडून अनधिकृत जाहिरातीबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर संबंधित प्रभाग क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी २४ तासांच्या आत आवश्यक ती कारवाई करणे बंधनकारक करण्यात आले आहे. जर निर्धारित वेळेत कारवाई झाली नाही, तर नागरिकांनी थेट उपायुक्त पंकज गोसावी (Pankaj Gosavi) किंवा जाहिरात परवाना विभाग प्रमुख संजय ठाकूर (Sanjay Thakur) यांच्याकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन मनपाकडून (Jalgaon Municipal Corporation) करण्यात आले आहे.

दंडात्मक कारवाईसह थेट फौजदारी गुन्हे

महानगरपालिकेने स्पष्ट इशारा देत पूर्वपरवानगीशिवाय कोणतेही जाहिरात साहित्य लावू नये, असे सांगितले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात 'महाराष्ट्र मालमत्तेच्या विरूपणास प्रतिबंध अधिनियम, १९९५' अंतर्गत दंडात्मक कारवाईसह थेट फौजदारी गुन्हेही दाखल करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे. दरम्यान, शहरातील चौकांमध्ये उभारल्या जाणाऱ्या अवैध होर्डिंग्जमुळे अपघातांचा धोका वाढत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. त्यामुळे या नव्या समित्यांच्या स्थापनेनंतर प्रत्यक्षात परिस्थितीत बदल होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >