Monday, May 25, 2026

Rakhi Sawant : राखी सावंत झाली भावूक; "आजपर्यंत मला खरं प्रेमच मिळालं नाही"

Rakhi Sawant : राखी सावंत झाली भावूक;

मुंबई : बॉलिवूडची 'ड्रामा क्वीन' (Drama Queen) राखी सावंत (Rakhi Sawant) हिने तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत मोठे खुलासे केले आहेत. दोन अपयशी विवाह, प्रेमातील फसवणूक आणि माजी पतीवर केलेल्या गंभीर आरोपांमुळे राखी पुन्हा चर्चेत आली आहे. एका पॉडकास्टमध्ये बोलताना तिने आयुष्यात कधीच खरं प्रेम मिळालं नसल्याची खंत व्यक्त केली.

दोन लग्नं, दोन घटस्फोट; राखी सावंतची प्रेमकहाणी अपूर्णच

राखी सावंतने सांगितले की, तिच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले. २०१९ मध्ये तिने रितेश सिंहसोबत लग्न केले होते. दोघेही लोकप्रिय रिअॅलिटी शो बिग बॉसमध्ये एकत्र झळकले होते. मात्र, २०२२ मध्ये या नात्याचा शेवट झाला. त्यानंतर त्याच वर्षी राखीने आदिल खान दुर्रानीसोबत दुसरे लग्न केले. हे नातेही फार काळ टिकू शकले नाही. काही महिन्यांतच दोघांचा घटस्फोट झाला. त्यावेळी दोघांनी एकमेकांवर अनेक गंभीर आरोप केले होते.

"लोक मला वाइफ मटेरियल (Wife Material) मानत नाहीत"

एका पॉडकास्टमध्ये बोलताना राखी सावंत म्हणाली, "लोक मला पत्नी म्हणून योग्य समजत नाहीत. मी स्पष्टवक्ती आहे, स्वतःच्या पायावर उभी आहे आणि माझं आयुष्य माझ्या अटींवर जगते. कदाचित याच कारणामुळे मला लग्नासाठी कोणी पसंत करत नाही." तिने पुढे सांगितले की, समाजात अनेक मुलींना सहज स्वीकारले जाते, मात्र तिच्यासारख्या स्पष्टपणे मत मांडणाऱ्या महिलेला योग्य जोडीदार मिळणे कठीण जाते. यामुळे तिला अनेकदा मानसिक वेदना सहन कराव्या लागतात.

आवडत्या व्यक्तीनेही लग्नासाठी दिला नकार

राखीने मुलाखतीत आणखी एक धक्कादायक खुलासा केला. काही दिवसांपूर्वी तिने स्वतः एका व्यक्तीला लग्नासाठी विचारले होते. मात्र त्या व्यक्तीने तिला थेट नकार दिला. राखी म्हणाली, "मी एका मुलाला लग्नाबद्दल विचारलं. त्यावर तो म्हणाला, 'तुझ्याशी लग्न कोण करेल?' मी कारण विचारलं तर त्याने सांगितलं की तू वाइफ मटेरियल नाहीस. आजही मला समजत नाही की लोकांच्या मते पत्नी होण्यासाठी नेमकं काय असावं लागतं."

आईच्या आग्रहामुळे चुकीच्या व्यक्तीशी लग्न

राखीने सांगितले की, तिच्या आईच्या सल्ल्यानुसार तिने भविष्यासाठी एग्स फ्रीज करून ठेवले होते. यासाठी तिला अनेक इंजेक्शन, मोठा खर्च आणि शारीरिक त्रास सहन करावा लागला. कारण तिला भविष्यात आई बनायचे आहे. मात्र, आईच्या सततच्या आग्रहामुळे तिने घाईघाईत चुकीच्या व्यक्तीसोबत लग्न केल्याचा दावा केला. "आई सतत लग्न कर, लग्न कर असं सांगत होती. त्या दबावात मी चुकीचा निर्णय घेतला. नंतर लक्षात आलं की तो माणूस माझ्यासाठी योग्य नव्हता," असे ती म्हणाली.

आदिल खान दुर्रानीवर गंभीर आरोप

राखी सावंतने तिचा माजी पती आदिल खान दुर्रानीवर गंभीर आरोप करताना सांगितले की, विवाहानंतर तिला शारीरिक आणि मानसिक छळ सहन करावा लागला. "तो मला मारहाण करायचा, मानसिक त्रास द्यायचा आणि सतत टॉर्चर करायचा. त्याची वागणूक अशी होती की एखादी व्यक्ती स्वतःहून आत्महत्येचा विचार करेल. एकदा तो मला एका ठिकाणी घेऊन गेला होता. त्यावेळी त्याचा हेतू मला समजला आणि मी तिथून पळून गेले," असा दावा राखीने केला. तिने पुढे आरोप केला की, "माझ्या संपत्तीवर डोळा ठेवून तो मला संपवण्याचा प्रयत्न करत होता. त्याने माझे सुमारे ३ कोटी रुपयेही घेतले."

पुन्हा एकदा चर्चेत राखी सावंत

राखी सावंतच्या या धक्कादायक खुलाशांमुळे तिच्या वैयक्तिक आयुष्याची चर्चा पुन्हा रंगली आहे. दोन अपयशी विवाह, प्रेमातील निराशा आणि माजी पतीवर केलेले गंभीर आरोप यामुळे राखी सावंत पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. तिच्या म्हणण्यानुसार, ती आजही खरं प्रेम आणि आयुष्यभर साथ देणाऱ्या जोडीदाराच्या शोधात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा