Tuesday, May 7, 2024
Homeअध्यात्मसाईनाथांचे पितळेंना चांदीचे तीन रुपये दान

साईनाथांचे पितळेंना चांदीचे तीन रुपये दान

विलास खानोलकर

हरिश्चंद्र पितळे यांच्या फीट येणाऱ्या मुलाला बाबांच्या कृपेने बरे वाटले. साईनी सांगितले, “श्रद्धा, सबुरी व देवावर विश्वास ठेवा’’ त्याप्रमाणे आपला मुलगा बरा झाला म्हणून पितळे यांनी मिठाई वाटली. बाबांना दक्षिणा दिली. त्यांची बाबांवर भक्ती जडली. ते मुंबईस जाण्यास निघाले तेव्हा श्री बाबांनी त्यांना तीन रुपये दिले आणि म्हणाले, “मी तुला याआधी दोन रुपये दिले आहेत. आज हे आणखी तीन रुपये देतो. घरी गेल्यावर त्यांची पूजा कर. तुझे कल्याण होईल.’’ पितळेंनी ते रुपये घेतले. बाबांना वंदन करून ते मुंबईस निघाले.

परतीच्या प्रवासात त्यांच्या मनात आपण याआधी बाबांना कधीही भेटलो नाही, तरीही त्यांनी मला दोन रुपये दिल्याचे कसे सांगितले. हे एकच विचारचक्र चालू होते. त्यांनी अनेक तर्क लावले, पण उपयोग झाला नाही. घरी गेल्यावर त्यांनी आपल्या वृद्ध आईला शिर्डीतील सर्व वृत्तान्त सांगितला. त्या दोन रुपयांबद्दलही सांगितले. ते ऐकून ती म्हणाली, “तू लहान असताना तुझ्या वडिलांनी तुला अक्कलकोटला श्री स्वामींच्या दर्शनास नेले होते. त्यावेळी समर्थांनी त्यांना प्रसाद म्हणून दोन रुपये दिले व त्यांची पूजा करण्यास सांगितले. तुझे वडील त्या दोन रुपयांची नित्य पूजा करीत असत. ते स्वर्गवासी झाल्यानंतर घरातील मुले पूजाअर्चा करू लागली. त्या रुपयांची कोणी काळजी घेतली नाही. ते कुठे हरवले हेही माहीत नाही. पुढे त्यांची आठवणही राहिली नाही.

पण आता काळजी घे. साईंनी दिलेल्या तीन रुपयांची रोज पूजा कर. आपल्या घरात भक्तीचे व समृद्धीचे आगमन व्हावे म्हणूनच त्यांनी हा प्रसाद दिला आहे.’’ आईच्या बोलण्यातून पितळ्यांना बाबांच्या वचनातील सत्यार्थ उमगला. ते तीन रुपयांची नित्य पूजा करू लागले.

हरिश्चंद्र पुत्र पडे आजारी
गाव फिरूनी झाले बेजारी ।। १।।
औषधे करूनही अति आजारी
येई फिट जाई फिट ।। २।।
क्षणाक्षणात मृत्यूशी भेट
ऐकूनी दासगणूंचे कीर्तन ।। ३।।
केले साईनाथांचे
आवर्तन रोग्याचे झाले
पूर्ण परिवर्तन ।। ४।।
अन् फिट पुत्र झाला फिट
पितळेसूत झाला धडधाकट ।। ५।।
चांदीचे तीन रुपये दिले फटाफट
साई म्हणे आधीच
दोन दिले झटपट ।। ६।।
कल्याण होईल निघ सटासट
वृद्ध आईने सांगितले वट ।। ७।।
पित्याला समर्थांनी दिले रुपे दोन
पुजाकर ठेवूनी गुलाल द्रोण ।। ८।।
हरवले ते दोन, विसरू नको हे तीन
साई करेल कल्याण
पिढ्या तीन ।। ९।।
श्रद्धा, सबुरी, शांततेत कल्याण
साई म्हणे १० पिढ्याचे हाईल कल्याण।। १०।।

vilaskhanolkardo@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -