Friday, May 3, 2024
Homeसाप्ताहिकरिलॅक्सFriendship : नातं मैत्रीचं...

Friendship : नातं मैत्रीचं…

  • मनातले कवडसे : रूपाली हिर्लेकर

‘एकदा भेटू या ना’, असं अनेकदा म्हणता म्हणता अखेर एक दिवस आम्ही सर्वजण एकदाचे भेटलो! तब्बल वीस वर्षांनी आम्ही प्रत्यक्ष भेटत होतो. साहजिकच प्रत्येकामध्ये बदल झाले होते. बहुतेकांच्या केसांवर रूपेरी छटा डोकावू लागल्या होत्या, तर कोणाचं चक्क टक्कलही दिसू लागलं होतं. दहावीच्या वर्गातील सर्वात सुंदर म्हणून भाव खाणाऱ्या शाळेच्या त्यावेळच्या हिराॅईनला तर तिच्या आताच्या अतिविशाल आकारमानामुळे ओळखणंही कठीण गेलं. सुरुवातीपासूनच सडपातळ अंगकाठी असलेल्या काही जणात मात्र फारसा बदल झालेला नव्हता. अर्थात एवढे सारे बदल सामावून घेणाऱ्या मैत्री नावाच्या भावनेत मात्र किंचितही बदल झालेला नव्हता हे विशेष. इतक्या वर्षांनी भेटूनही मैत्रीत अजूनही तोच ताजेपणा जाणवत होता. आमच्या जुन्या शाळेतच भेट झाल्यामुळे शाळेच्या आठवणींना आपसूकपणे उजाळा मिळाला. तिथला प्रत्येक दगड अन् दगड आणि भिंतन् भिंत जणू आमच्या मैत्र भावनेचे साक्षीदार व साथीदार होते. आमच्यातील एकाने म्हणजेच विनोद वीराने पूर्ण कार्यक्रमात मिश्किल जोक्स व गमती जमती करून सर्वांना हसवलं आणि त्यामुळे वातावरणात मोकळेपणा आला. मग ओळख परेड आणि एकेकाचे अनुभव ऐकून झाल्यावर अखेर निरोपाचा नाजूक क्षण आला. सर्वांना त्यावेळी दहावीचा निरोप समारंभ आठवला. मुली ढसढसा रडत होत्या आणि मुलं त्यावर हसत होती. आज मात्र मुलंही निरोप घेताना हळवी झाल्यासारखी वाटली. लवकरच पुन्हा भेटण्याचं वचन देऊन आम्ही निघालो. आपापल्या घरी पोहोचलो. पण मनात पुन्हा तरारून आलेलं मैत्रीचं रोप आता आमच्या सोबतीला होतं. कित्येक वर्ष आपापसात संवाद नसल्याने ते काहीसं कोमेजल्यासारखं झालं होतं, पण भेटीच्या शिडकाव्याने आज ते पुन्हा डवरलं.

खरंच हे मैत्रीचं नातं किती छान असतं, नाही? मनात असेल ते, आहे ते, आहे तसं, कोणताही आडपडदा न ठेवता आपण ज्या व्यक्तीला सांगू शकतो, तो खरा मित्र किंवा मैत्रीण. कदाचित रक्ताच्या नात्यापेक्षाही जिथे आपण कम्फर्टेबल असतो, जिथे आतलं-बाहेरचं असं काहीच नसतं, तिथेच मैत्री टिकते. वेळप्रसंगी मित्रच मदत करतात व आपलं काही चुकलं, तर समज देतात व त्या परिस्थितीत समजूनही घेतात. म्हणूनच आयुष्यात मैत्रीला खूप महत्त्व आहे. रोजच्या रोज भेटता नाही आलं तरी आपल्याला हे पूर्ण माहीत असतं की, ही व्यक्ती आपल्याला कधीच विसरू शकणार नाही. अडीअडचणीला, कसोटीच्या क्षणी हीच व्यक्ती धावून येणार याबद्दल एक विश्वासही तिथे असतो.

आयुष्याच्या वाटेवर तशी आपल्याला अनेक माणसं भेटतात. काही वाटसरूप्रमाणे भेटतात आणि निघून जातात. पण ज्यांच्याशी आपले विचार, मतं, आवडी-निवडी जुळतात त्यांच्याशी कळत-नकळतपणे आपली मैत्री जमून जाते. काही वेळा आवडी १०० टक्के जुळत नसल्या तरी जेव्हा समोरची व्यक्ती आपल्याला समजून घेते, मतभेदांसकट ती आपल्याला स्वीकारून आपल्यासोबत राहते, आपली साथ देते तिथे खरी मैत्री असते! असे मित्र-मैत्रिणी भेटायला खरं तर खूप भाग्य लागतं.

आयुष्यात वेगवेगळ्या वळणावर भेटणारे मित्र-मैत्रिणी आपल्याला खूप काही देऊन जातात. मैत्री शिकवून जाते, असं म्हणतात ते किती खरंय. कारण त्या जाणिवेसोबत हे नातं अधिकाधिक घट्ट बनत जातं, परस्परांना समृद्ध करतं. मैत्रीची अनेक मोठ-मोठी उदाहरणं प्रसिद्ध आहेत. कृष्ण-सुदाम्याची मैत्री आदर्श मानली जाते. राम व सुग्रीव हेही चांगले मित्र होते. अलीकडच्या काळात टिळक-आगरकर यांचं उदाहरण दिलं जातं. दोघांमध्ये अनेक मुद्द्यांवर मतभेद असूनही ते परस्परांची योग्यता व महत्त्व जाणून होते. संगीताच्या क्षेत्रात गाजलेल्या संगीतकारांच्या जोडगोळ्या हीदेखील मैत्रीची सुरेल उदाहरणं मानता येतील.

आपल्या समाजात स्त्री-परुष मैत्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन अद्याप तितकासा निकोप बनलेला नाही. त्याकडे संशयानेच पाहिलं जातं. मात्र बिनधास्त नवतरुणाई आता मुला-मुलीत फार फरक मानत नाही. मित्र-मैत्रिणींचे ग्रुप फ्रेंडशिप एकत्रितपणे खऱ्या अर्थाने एन्जॉय करताना दिसतात. मात्र सोशल मीडियावरच्या दिखाऊ मैत्रीपासून जरा जपूनच राहायला त्यांनी शिकायला हवं. प्रत्यक्ष भेटीतला मैत्रीचा ओलावा आभासी मैत्रीत कसा अनुभवता येणार? अगदी रोजच्या रोज जरी भेट होत नसली तरी कधीतरी भेटून आपल्या मित्र-मैत्रिणींच्या आयुष्यात काय चाललंय, ते कसे आहेत? याची विचारपूस करायला हवी. नैराश्य, हताशता व त्यातून उचललं जाणारं एखादं आत्महत्येपर्यंतचं टोकाचं पाऊल सच्च्या मैत्रीच्या सेफ्टी व्हाॅल्वमुळे कदाचित माघारी वळवता येऊ शकेल. इतकी ताकद मैत्रीमध्ये निश्चितच आहे. ‘मैत्री दिना’निमित्त मिळालेल्या असंख्य संदेशांपैकी एक संदेश इथे सहजच आठवला – जीवनाची चौकट मोडून जे जगायला शिकवतं, त्याला ‘फ्रेंड सर्कल’ म्हणतात! म्हणूनच मैत्रीचं वर्तुळ फक्त ‘फ्रेंडशिप डे’पुरतं मर्यादित न राहता आयुष्यभर साथ निभावणारं असावं. तेव्हाच ते टिकेल आणि आपल्या जगण्यालाही अर्थ मिळवून देईल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -