ठाणे : श्री दत्त जयंती आणि नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दि. २५ डिसेंबर पर्यंत मनाई आदेश लागू केला आहे, अशी माहिती ठाणे शहर पोलीस आयुक्त, जय जीत सिंह यांनी दिली आहे.
ठाणे पोलीस आयुक्तालय परीसरात जिवीत व वित्त सुरक्षित राहण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी खालील कृत्यांना मनाई आदेश देत आहे.
शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले. दंड, बंदुका, लाठ्या किंवा शरीरास इजा करण्यासाठी वापरण्यात येईल अशी कोणतीही वस्तु बरोबर वाहून नेणे, बाळगणे, जमा करणे व तयार करणे. दगड किंवा क्षेपणास्त्रे किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बरोबर नेणे, जमा करणे व तयार करणे. कोणताही दाहक किंवा स्फोटक पदार्थ आणि द्रव बाळगणे, बरोबर नेणे. सार्वजनिक रितीने घोषणा देणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे इत्यादी. कोणत्याही इसमाचे चित्राचे / प्रतिकात्मक प्रेताचे किंवा पुढाऱ्यांच्या चित्राचे / प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे. सभ्यता अगर नितीमत्ता यास धोका पोहोचेल किंवा राज्यातील शांतता धोक्यात येईल किंवा ज्यामुळे राज्य शासन उलथून पडेल अशी भाषणे, हावभाव, चित्रफलक, प्रदर्शित करणे. पाच किंवा पाचापेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमणे, जाहीर सभा घेणे. मिरवणुका काढणे, घोषणा प्रतिघोषणा देणे इत्यादी कृत्ये.
सदर मनाई आदेश खालील व्यक्तींना लागू राहणार नाहीत
‘जो कोणी इसम सरकारी नोकर आहे, किंवा ज्यास वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्य निमित्ताने शस्त्रे घेणे भाग पडेल, किंवा ज्यास अधिकार प्रदान केलेल्या अधिकाऱ्याने सुट दिलेली आहे.”
सदर आदेश खालील मिरवणुका व जमावास लागू राहणार नाहीत
लग्न कार्यासाठी जमलेले लोक, प्रेत यात्रा व अंत्यसंस्कारासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुका. सरकारी/निमसरकारी कामासाठी कोर्ट, कचेन्या येथे जमलेले लोक. सरकारी संस्था, शैक्षणिक संस्था या ठिकाणी जमलेला जनसमुदाय. पोलीस आयुक्त व त्यांनी प्रदान केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या सभा/ मिरवणुका, सर्व शासकीय/निमशासकीय कर्मचारी हे कर्तव्य पार पाडीत असलेले ठिकाण,
सदर मनाई आदेश दिनांक 25 डिसेंबर 2021 रोजी 24.00 वाजेपर्यंत अंमलात राहील. वरील मनाई आदेशाचा भंग करणाऱ्या विरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन 1951 चे कलम 135 प्रमाणे कारवाई करण्यात येईल, असे ठाणे शहर पोलीस आयुक्त, जय जीत सिंह यांनी कळविले आहे.