मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेला (India vs South Africa Test series) सुरुवात होण्यापूर्वीच भारताला धक्का बसला आहे. ऋतुराज गायकवाडला (Ruturaj Gaikwad) झालेली दुखापत बरी न झाल्यामुळे त्याने दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतून माघार घेतली आहे. तर दुसरीकडे भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीला (Virat Kohli) एका कौटुंबिक आपत्कालीन परिस्थितीमुळे (Family Emergency) मायदेशी परतावे लागले आहे. त्यामुळे तो तीन दिवसीय सराव सामन्याला मुकला आहे.
ऋतुराजला पोर्ट एलिझाबेथ येथे १९ डिसेंबर रोजी दुसऱ्या वन डे सामन्यात दुखापत झाली होती आणि तो तिसरा सामना खेळला नव्हता. आता तो दोन कसोटींपैकी एकाही सामन्यापूर्वी बरा होण्याची शक्यता नाही. त्यामुळे संघ व्यवस्थापनाने बीसीसीआयशी (BCCI) सल्लामसलत केल्यानंतर त्याला तात्काळ रिलीज करण्याचा निर्णय घेतला. सध्या तो बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे.
तर विराट कोहली दक्षिण आफ्रिका कसोटीसाठी भारतीय संघासोबत दाखल झाला होता. परंतु कौंटुबिक कारणास्तव तो भारतात परतला आहे. विराट कोहलीने भारतात येण्यासाठी तीन दिवसांपूर्वी बीसीसीआय व संघ व्यवस्थापनाची परवानगी घेतली होती. त्यामुळे त्याला तीन दिवसाच्या सराव सामन्यात खेळता आले नाही. त्याची फॅमिली इमर्जन्सी नेमकी काय आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र मिळालेल्या माहितीनुसार २६ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या जोहान्सबर्ग कसोटीपूर्वी विराट परत येणार आहे. ही काही प्रमाणात दिलासादायक बाब आहे.
भारताच्या कसोटी संघात कोणते खेळाडू?
या मालिकेसाठी भारताने युवा फलंदाज यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल यांचाही संघात समावेश केला आहे. ऋतुराजला संधी मिळाली, मात्र दुखापतीमुळे तो बाहेर आहे. इशान किशनलाही स्थान देण्यात आले होते मात्र ईशानने या मालिकेतून आपले नाव काढून घेतले, त्यामुळे त्याच्या जागी केएस भरतला टीम इंडियात स्थान देण्यात आले. या संघात आता रोहित शर्मा, शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली. श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, आर अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दूल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, केएस भरत यांचा समावेश आहे.