पालघर: वसई – विरार भागात गेल्या २४ तासांमध्ये ९०१ तर उर्वरित पालघर ग्रामीण भागात १६६ असे जिल्ह्यात एकूण १०६७ कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत.त्यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे. दरम्यान, १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरण मोहिमेलाही चांगला वेग आला आहे. लसींचा मुबलक साठा उपलब्ध असल्यामुळे या कामात आता अडथळे येत नाहीत हे विशेष.
कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. निर्बंध कडक झाले तरी हरकत नाही,पण लॉकडाऊन पुन्हा नको,असे लोकांचे म्हणणे आहे.दरम्यान, राज्य शासनाच्या निर्णयानुसार काल रात्री उशीरा जिल्हाधिकाऱ्यांनी पहिली ते पाचवीच्या शाळा बंद करण्याचे आदेश जारी केले.
या निर्णयाचे शहरी व ग्रामीण भागांतील पालकांनी स्वागत केले आहे. यापूर्वी आलेल्या दोन्ही लाटेत जिल्ह्याच्या ग्रामीण भागात फारसे रुग्ण सापडले नव्हते; पण सध्या आलेल्या तिसऱ्या लाटेत ग्रामीण भागांतही रुग्ण मोठ्या संख्येने सापडू लागले आहेत. त्यामुळे ग्रामीण आरोग्य यंत्रणाही सक्रिय झाली आहे. काही कोविड सेंटर्स सुरू करण्यात येणार आहेत. मात्र या रुग्णवाढीमुळे व्यापार व हॉटेल व्यवसायिकामध्ये भीतीचे वातावरण आहे. राज्यसरकार निर्बंध अधिक कडक करणार असल्याच्या वृत्ताने सध्या सर्वचजण चिंतेत सापडले आहेत.
लॉकडाऊन नको -अनिल पाटील, व्यापारी नालासोपारा पूर्व
निर्बंध कडक केले तरी चालतील; पण सरसकट लॉकडाऊन नको. गेल्या वर्षी झालेल्या लॉकडाऊनमुळे आमची वाताहत झाली,आता त्याची पुनरावृत्ती नको.
आता लॉकडाऊनचा विचारच नको – सुगंधा मेहेर, मच्छी विक्रेती, पालघर
सरकारने आता लॉकडाऊनचा विचारच करू नये.कारण अशा लॉकडाऊनमुळे कष्टकरीवर्गावर उपासमारीची वेळ येते.गेल्या वर्षी तो अनुभव आम्ही समस्त महिलांनी घेतला.लॉकडाऊनची दाहकता कशी असते ते आम्ही चांगलंच अनुभवलं आहे.
शाळा बंद निर्णय योग्य – सुशीला राणे, गृहिणी विरार प.
मुलांच्या शाळा बंद ठेवण्याचा चांगला निर्णय शासनाने घेतला आहे.या निर्णयामुळे आम्हा पालकांचा जीव भांड्यात पडला आहे.कारण सध्या प्रादुर्भावाला आलेला वेग लक्षात घेता,सरकारने योग्य वेळी योग्य निर्णय घेतला आहे.