आमदार नितेश राणे आणि नवनीत राणा यांची मागणी
नागपूर : अभिनेते सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियान (Disha Salian) यांचे मृत्यू झाले, तेव्हापासून फक्त आदित्य ठाकरे यांचेच नाव का समोर येत आहे. याचा विचार करण्याची गरज आहे. इतरांच्या नावांची चर्चा का होत नाही, हे समजण्याची गरज असल्याचे वक्तव्य भाजप आमदार नितेश राणे यांनी केले. तसेच जशी श्रद्धा प्रकरणी आफताबची नार्कोटेस्ट होते तशी आदित्य ठाकरे यांची एकदा नार्कोटेस्ट करा, पूर्ण सत्य बाहेर येईल, असेही ते म्हणाले. विधानसभेच्या बाहेर प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. रिया चक्रवर्तीला एयू नावाच्या व्यक्तीने ४४ फोन का केले होते, याचाही सत्य बाहेर येण्याची गरज असल्याचेही यावेळी ते म्हणाले.
पुढे नितेश राणे म्हणाले, आदित्य ठाकरेंवर आरोप करणारे खासदार राहुल शेवाळे हे मातोश्रीच्या किचन कॅबिनेटमध्ये होते. जेव्हा ते पक्षाला पेट्या पाठवत होते. तेव्हा त्यांची किंमत होती. मात्र आता त्यांनी सत्याची बाजू घेतली असल्याने त्यांची किंमत नसल्याचे सांगण्यात येत आहे.
तसेच आजही दिशा सालियान यांच्या मृत्यूचे प्रकरण मुंबई पोलिसांकडेच आहे. सीबीआयकडे अद्याप वर्ग झाले नाही. या निमित्ताने आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना या प्रकरणाचा तपास पुन्हा सुरु करण्याची विनंती करणार आहे. ८ जून रोजी काय झाले? दोन वेळा तपास अधिकारी का बदलण्यात आले? या प्रकरणाशी संबंधित महत्त्वाचे सीसीटीव्ही फुटेज का गायब झाले? तसेच फ्लॅटच्या विजिटर्स बुकमधील पाने कोणी फाडली? दिशाचा पोस्टमोर्टम रिपोर्ट बाहेर का आला नाही? या प्रश्नांची उत्तरे समोर येणे गरजेचे असल्याचेही यावेळी नितेश राणे म्हणाले.