Tuesday, April 30, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यमुंबईत कोरोनाचा स्फोट

मुंबईत कोरोनाचा स्फोट

सीमा दाते

मुंबई महापालिकेच्या प्रयत्नाने कोरोनाची पहिली आणि दुसरी लाट यशस्वीपणे थोपवली गेली; मात्र आता वाढत असलेली रुग्णसंख्या पाहता हीच कोरोनाची तिसरी लाट तर नाही ना, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेनंतर मुंबई महापालिकेने रुग्णसंख्या नियंत्रणात आणली होती. मात्र आता अखेर कोरोनाचा स्फोट झाला आहे. मुंबईतील आकडेवारी ६ हजारांच्याही वर गेली. त्यामुळे मुंबईसह राज्यात पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शनिवारी समोर आलेल्या आकडेवारीने पुन्हा मुंबई हादरली. जी कोरोनारुग्णांची संख्या १०० आणि २००च्या आसपास होती; ती पुन्हा आता ५ हजार आणि ६ हजारांच्या घरात गेली आहे. शनिवारी कोरोना रुग्णांची आकडेवारी ही ६३४७ एवढी होती. एकूणच काय तर तिसरी लाट येऊच नये म्हणून पालिका खूप प्रयत्न करत आहे. १०० टक्के लसीकरणाचे उद्दिष्टे पालिका पूर्ण करू पाहत असतानाच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने पुन्हा आक्रमण केले की काय, अशी भीती वाटू लागली आहे. त्यातच ओमायक्रॉन या नव्या व्हेरिएंटमुळे पालिका, राज्य सरकार आणि जनतेच्या मनात चिंता दिसत आहे आणि म्हणूनच जनतेने आता गाफील राहून चालणार नाही.

मुंबई महापालिकेने पुन्हा कोरोना चाचण्यांवर भर दिला आहे. दिवसाला ५० हजारांहून अधिक चाचण्या करण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. त्याचप्रमाणे लसीकरणावरही पालिकेने भर दिला आहे. ज्यांनी केवळ कोरोना प्रतिबंधक लसीचा एकच डोस घेतला आहे, त्यांना लसीचा दुसरा डोस देण्यासाठी पालिकेने लसीकरण केंद्र सुरू ठेवले असून डोस न घेतलेल्यांशी पालिकेकडून संपर्क साधण्यात येत आहे. एकूणच काय, तर ही कोरोनाची तिसरी लाट असेल, तर या लाटेचा परिणाम मोठ्या प्रमाणावर होऊ नये यासाठी पालिकेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार लहान मुलांसाठी देखील लसीकरण सुरू केले आहे. सोमवार म्हणजेच आजपासून मुंबईतील १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी लसीकरण सुरू केले आहे. सध्या ओमायक्रॉनचा प्रसार वेगाने होत असून लहान मुलांना त्याची बाधा होऊ नये, यासाठी लसीकरण सुरू केले आहे.

विशेष म्हणजे, मुंबईतील कोरोना रोखण्यासाठी पालिका आयुक्तांनी आणि राज्य सरकारने नियमावली तयार केलेली आहे. मुंबईतील निर्बंध कडक करण्यात आले असून मुंबईकरांना मात्र आता स्वत: या नियमांचे पालन करणे गरजेच आहे. मात्र काही ठिकाणी तर लोकांकडून या नियमांचे पालन होत नसल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्यावर्षी एप्रिलपासून २८ डिसेंबर २०२०पर्यंत पालिकेने मास्क न लावणाऱ्यांकडून ८३ कोटी १८ लाख १८ हजार ५४५ इतका दंड वसूल केला आहे. पालिकेने तब्बल ४१ लाख ८५ हजार १९८ इतक्या लोकांकडून ही वसुली केली आहे. म्हणजे, विनामास्क सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहून लोकांनी स्वतः भानावर असणं गरजेचं आहे. मुंबईत होणारी कोरोना रुग्णसंख्या रोखण्यासाठी पालिका मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहेच; मात्र त्यासाठी जनतेनेही तितकेच सहकार्य करणं गरजेचं आहे. महापालिकेकडून दिलेल्या नियमावलीनुसार बंदिस्त सभागृहांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या कोणत्याही कार्यक्रमासाठी सभागृहाच्या एकूण क्षमतेच्या ५० टक्के व्यक्तींनाच उपस्थितीची परवानगी आहे. तर मोकळ्या जागेत होणाऱ्या कार्यक्रमासाठी जागेच्या क्षमतेच्या २५ टक्के एवढ्याच संख्येने उपस्थितीला परवानगी असेल. त्याचबरोबर एखाद्या जागेतील कोणत्याही आयोजनात एक हजारापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येणार असतील, तर त्यासंदर्भात स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला आगाऊ सूचना देऊन त्याबाबतची पूर्वमंजुरी प्राप्त करणे अत्यावश्यक आहे. हॉटेल, उपहारगृहे, सिनेमगृहे व खासगी आस्थापनांसाठी कोविड नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. पण त्याचसोबत शाळा, सिनेमागृहे, उपाहारगृहे सुरू ठेवण्यावर देखील बंधने येण्याची शक्यता आहे.

महापालिकेकडून हे महत्त्वाचे नियम जारी करण्यात आले आहेत. कोरोनाला आळा बसण्यासाठी पालिकेसोबतच जनतेनेही सतर्क राहणं गरजेचं आहे म्हणजे लवकरच कोरोनाला रोखण्यात मुंबई यशस्वी होईल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -