- विशेष : भालचंद्र ठोंबरे
महाभारतात कौरव पांडवांचे युद्ध होणार, हे निश्चित झाल्यावर, देशोदेशीच्या राजांनाही या युद्धात सहभागी होण्याचे आमंत्रण देण्यात आले. त्याप्रमाणे काही राजे कौरवांकडून, तर काही पांडवांकडून युद्धात सामील झाले. त्याप्रमाणे कर्नाटकातील उडपीचा राजाही युद्धात सहभागी होण्यासाठी आला. मात्र श्रीकृष्णाची भेट घेऊन, त्याने आपली इच्छा प्रकट केली. युद्धात कौरवांकडून ११ औक्षणीय व पांडवांकडून ७ असे एकंदर १८ औक्षणीय सैन्य सहभागी होणार, हे निश्चित झाले होते. या सर्वांच्या जेवणाची व्यवस्था करण्याची आपली इच्छा असल्याचे उडपीच्या राजाने भगवान श्रीकृष्णासमोर व्यक्त केली. भगवान श्रीकृष्णानेही त्यास आनंदाने परवानगी दिली.
युद्धाला सुरुवात झाली. दोन्ही पक्षांच्या लोकांची जेवणाची व्यवस्था एकत्रच होती. दररोज युद्धात निरनिराळ्या संख्येने योद्धे विरगतीस प्राप्त होत असतानाही कधीही अन्न कमी पडले नाही किंवा वाया गेले नाही. कोणी उपाशी राहिले नाही किंवा अन्नाची नासाडीही झाली नाही. या गोष्टीचे युधिष्ठिराला नेहमीच आश्चर्य वाटायचे. युद्ध समाप्तीनंतर एके दिवशी या संदर्भात उडपी राजाला विचारले असता, हे सर्व भगवंताच्याच कृपेने शक्य झाल्याचे सांगितले.
युद्धाच्या आदल्या रात्री किंवा सकाळी भगवान श्रीकृष्ण उकडलेल्या शेंगा खात असत, ते जेवढ्या शेंगा खात, त्याच्या १०,००० पटीत योद्धे विरगतीला प्राप्त होणार, असा हिशोब करून, अन्न शिजवले जात असे व ते कधीही कमी झाले नाही अथवा वाया गेले नाही. उदा. भगवंतानी १० शेंगा खाल्ल्यास एक लाख योद्धे विरगतीला प्राप्त होणार, हे लक्षात घेऊन, त्याप्रमाणे अन्न शिजविण्याच्या सूचना उडपीचा राजा आपल्या सैनिकांना देत असे. ही सर्व कल्पना भगवंतानी आधीच देऊन ठेवलेली असल्यानेच, हे शक्य झाल्याचे राजाने सांगितले. कर्नाटकातील उडप्पी जिल्ह्यातील कृष्ण मठात अशा प्रकारची गोष्ट नेहमीच सांगितल्या जातात असे म्हणतात. हा मठ उडपीच्या सम्राटने बांधल्याचे मानले जाते. पुढे माधवाचार्याने याचा विस्तार केला.