Sunday, April 28, 2024
Homeसाप्ताहिकरिलॅक्ससायबर हेल्पलाइनमुळे मुंबईत तक्रारदारांना मिळाले ५० कोटी परत

सायबर हेल्पलाइनमुळे मुंबईत तक्रारदारांना मिळाले ५० कोटी परत

गोलमाल – महेश पांचाळ

एक उदाहरण : दक्षिण मुंबईत राहणाऱ्या एका महिलेला इंस्टाग्रामवर शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीला प्रोत्साहन देणारी जाहिरात दिसली होती, त्यासोबत लिंक होती. लिंकमधून शेअर बाजारातील गुंतवणुकीद्वारे वाढीव नफ्याचे आमिष दाखवण्यात आली होती. सुरुवातीला, महिलेने अंदाजे ४.५६ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आणि नंतर ती तिच्या गुंतवलेल्या भांडवलावर नफा स्वरूपातील पैसे काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तिला समजले की, ती सायबर फसवणुकीला बळी पडली आहे. या महिलेकडून मुंबई गुन्हे शाखेच्या सायबर क्राइम विभागाला सायबर फसवणूक झाल्याची तक्रार १९३० या हेल्पलाइनवर कॉलद्वारे कळविण्यात आली. घटनेची माहिती हेल्पलाइनवर दिल्यानंतर सायबर सेलने वेगाने तपास सुरू केला. चौकशी दरम्यान, फसवणूक केलेले पैसे वेगवेगळ्या बँकांमधील विविध खात्यांमध्ये हस्तांतरित करण्यात आल्याचे पोलिसांना आढळले. महिलेच्या रक्कमेपैकी अंदाजे ७० ते ८० लाख रुपये गुन्हेगारांनी आधीच काढण्यात आले होते. उर्वरित रक्कम तीन कोटी ८० लाख रुपये ४८ तासांत गोठवण्यात सायबर क्राइम विभागाला यश आले.

सायबर पोलिसांकडे तत्काळ तक्रार केली, तर पैसे परत मिळण्याची शक्यता अधिक आहे, हे या उदाहरणावरून दिसून येते. मुंबई शहरातील नागरिकांची सायबर गुन्ह्यांमध्ये फसवणूक झालेली रक्कम संबधित बँक खात्यांमध्ये गोठविण्याकरिता मुंबई गुन्हे शाखा अंतर्गत १९३० क्रमांकाची हेल्पलाइन १७ मे २०२२ मध्ये कार्यान्वित केली आहे. याद्वारे सायबर गुन्ह्यात हस्तांतरित झालेली रक्कम तत्काळ गोठवण्याचे काम करण्यात येते. आतापर्यंत या अंतर्गतसुमारे ५० कोटी रुपयांची रक्कम गोठविण्यात आली आहे. त्यात ईमेल फिशिंग, ऑनलाइन जॉब फ्रॉड, क्लासिफाईड फ्रॉड, केवायसी अपडेटच्या नावाखाली फसवणूक, वधू-वर सूचन संकेतस्थळावरून ओळख करून फसवणूक, समाज माध्यमांवरून ओळख करून फसवणूक, ओटीपी फसवणूक, सेक्सटॉर्शनसारख्या फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये फसवणूक करण्यात आलेली ही रक्कम आहे. २०२२ पासून सायबर पोलिसांच्या हेल्पलाइनवर आतापर्यंत दोन लाख १५ हजार दूरध्वनी आले आहेत. त्यातील ३३ हजार ७३८ प्रकरणांच्या नोंदी एनसीआरपी संकेतस्थळावरील आहेत.दररोज या मदत क्रमांकावर १५०० ते १८०० दूरध्वनी येतात. रात्रीच्या वेळीही २५० ते ३५० दूरध्वनी या मदत क्रमांकावर येत असतात, असे सायबर विभागाचे पोलीस सांगतात.

पूर्वी सायबर गुन्ह्यांमध्ये बँकेची पडताळणी व अहवाल येईपर्यंत गुन्हा दाखल झाल्यानंतर आठवड्याचा कालावधी लागायचा. त्याचा फायदा घेत आरोपी खात्यातील रक्कम काढायचे. आता मात्र पोलिसांच्या हेल्पलाइनवर दूरध्वनी केल्यास तत्काळ रक्कम गोठवणे शक्य आहे. त्यासाठी १९३० या क्रमांकावर संपर्क साधणे आवश्यक आहे अथवा तत्काळ ऑनलाइन तक्रार करणे आवश्यक आहे. याशिवाय स्थानिक पोलीस ठाण्यात तत्काळ तक्रार केल्यास फसवणुकीचे पैसे वाचवणे शक्य असल्याचा विश्वास सायबर विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

सायबर गुन्हेगारांचा धोका देशभर वाढत चालला आहे. अनोळखी मोबाइल नंबरवर संपर्क साधून पीडितांची फसवणूक केल्याच्या घटना दररोज घडत आहेत. पीडित व्यक्तींची बँक खाती एका क्षणात रिकामी होत असल्याची उदाहरणे आजूबाजूला घडत आहेत. तथापि, सायबर सेलकडून पीडितांच्या मदतीसाठी केलेल्या उपाययोजनांमुळे त्यातील काहींना दिलासा मिळत आहे. रस्ते अपघातातील जखमीला तत्काळ उपचार मिळून जीव वाचला तर त्या काळाला गोल्डन अवर्स म्हणतात. त्याचप्रमाणे सायबर गुन्ह्यांमध्ये लवकर सायबर पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर पैसे वाचवणे शक्य आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहा.

maheshom108@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -