Thursday, August 27, 2026

Jalgaon : ११ हजार किमीच्या सात रेल्वे मार्गांचे लवकरच चौपदरीकरण, मुंबई-हावडा मार्गाचा समावेश

Jalgaon  : ११ हजार किमीच्या सात रेल्वे मार्गांचे लवकरच चौपदरीकरण, मुंबई-हावडा मार्गाचा समावेश

Jalgaon : देशातील अतिवर्दळीच्या रेल्वे मार्गांवरील वाढता प्रवासी आणि मालवाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी भारतीय रेल्वेकडून मोठी योजना आखण्यात आली आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सुमारे ११ हजार किलोमीटर लांबीच्या सात उच्च-घनता रेल्वे मार्गाचे चौपदरीकरण करण्याची रूपरेषा मांडली आहे. यामध्ये जळगाव आणि भुसावळमार्गे जाणाऱ्या मुंबई-हावडा रेल्वे मार्गाचाही समावेश असल्याची माहिती आहे.

या प्रस्तावित योजनेत दिल्ली-हावडा, हावडा-चेन्नई, चेन्नई-मुंबई, मुंबई-दिल्ली, दिल्ली-चेन्नई, मुंबई-हावडा आणि दिल्ली-गुवाहाटी या प्रमुख मार्गांचा समावेश आहे. देशातील प्रमुख महानगरे, औद्योगिक केंद्रे आणि विविध राज्यांना जोडणाऱ्या या मार्गांवर प्रवासी आणि मालगाड्यांची मोठी वर्दळ असते. सध्या अनेक मार्गांवर वाहतुकीची क्षमता मर्यादित असल्यामुळे गाड्यांचे वेळापत्रक सांभाळताना रेल्वे प्रशासनाला अडचणी येतात. चार मार्ग उपलब्ध झाल्यास अतिरिक्त रेल्वे वाहतूक क्षमता निर्माण होऊन प्रवासी गाड्यांच्या फेऱ्या वाढवणे, वेळापत्रक अधिक प्रभावी करणे आणि विलंबाचे प्रमाण कमी करणे शक्य होऊ शकते.

मालवाहतुकीलाही मिळणार चालना

चौपदरीकरणचा मोठा फायदा मालवाहतुकीला होण्याची शक्यता आहे. औद्योगिक क्षेत्रे, बंदरे, कृषी बाजारपेठा आणि उत्पादन केंद्रांना जोडणाऱ्या मार्गांवर मालगाड्यांची मोठी वाहतूक असते. अतिरिक्त मार्ग उपलब्ध झाल्यास मालगाड्यांसाठी स्वतंत्र वेळ आणि अधिक क्षमतेने वाहतूक करणे शक्य होईल. रेल्वेमार्गे मालवाहतूक वाढल्यास रस्ते वाहतुकीवरील अवलंबित्व कमी होऊ शकते. त्यामुळे वाहतुकीचा वेळ आणि खर्च कमी होण्यास मदत होऊन उद्योग आणि व्यापार क्षेत्रालाही फायदा होण्याची शक्यता आहे. रेल्वे हे मोठ्या प्रमाणात प्रवासी आणि माल वाहून नेण्यासाठी तुलनेने ऊर्जा-कार्यक्षम आणि पर्यावरणपूरक माध्यम मानले जाते. रेल्वेची क्षमता वाढल्याने अधिक वाहतूक रेल्वेकडे वळवण्याची संधी निर्माण होईल. परिणामी रस्त्यांवरील वाहतूक कोंडी, इंधनाचा वापर आणि प्रदूषण कमी करण्यास हातभार लागू शकतो.

रेल्वे नेटवर्कचे चौपदरीकरण दीर्घकालीन काम

अतिवर्दळीच्या मार्गांवर एकाच रेल्वे मार्गावर विविध प्रकारच्या गाड्या धावत असल्याने वेळापत्रकावर परिणाम होतो. त्यामुळे केवळ गाड्यांचा वेग वाढवण्यापेक्षा मार्गाची क्षमता वाढवणे अधिक महत्त्वाचे ठरणार आहे. चौपदरीकरणामुळे प्रवासी आणि मालवाहतुकीचे अधिक चांगले नियोजन करता येऊ शकते. मात्र ११ हजार किलोमीटरच्या रेल्वे नेटवर्कचे चौपदरीकरण हे मोठे आणि दीर्घकालीन काम आहे. त्यासाठी पूल, स्थानके, सिग्नलिंग, विद्युतीकरण आणि इतर पायाभूत सुविधांमध्येही बदल करावे लागणार आहेत. काही ठिकाणी जमीन संपादनासह स्थानिक अडचणीही येऊ शकतात. त्यामुळे हा प्रकल्प टप्प्याटप्प्याने राबवावा लागण्याची शक्यता आहे. देशातील केवळ १६ टक्के रेल्वे नेटवर्कवर सुमारे ४१ टक्के वाहतूक होत असल्याने या उच्च-घनता मार्गांची क्षमता वाढवणे महत्त्वाचे मानले जात आहे. चौपदरीकरणामुळे भविष्यातील प्रवासी आणि मालवाहतुकीची वाढती मागणी हाताळण्यासाठी रेल्वेला अतिरिक्त क्षमता मिळू शकते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >