Nashik : नाशिक शहराला नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाशी (Nagpur-Mumbai Samruddhi Mahamarg) थेट जोडण्यासाठी पांढुर्ली येथे नव्या कनेक्टरची उभारणी करण्याच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी तत्त्वतः मंजुरी दिली आहे. नाशिकपासून सुमारे २८ किलोमीटर अंतरावर हा कनेक्टर प्रस्तावित असून, सुमारे ३०० ते ३५० कोटी रुपयांचा हा प्रकल्प असल्याची माहिती आहे. या कनेक्टरमुळे नाशिककरांचा समृद्धी महामार्गापर्यंतचा प्रवास मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
प्रकल्प वेगाने पूर्ण करण्याचे नियोजन
नाशिकला समृद्धी महामार्गाशी थेट जोडणारा हा प्रकल्प पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी पूर्ण करण्याची तयारी सार्वजनिक बांधकाम विभागाने केली आहे. त्यामुळे हे काम अत्यंत वेगाने केले जाणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. पांढुर्ली कनेक्टर नाशिकपासून अंदाजे २८ किलोमीटर अंतरावर असेल. सुमारे ३०० कोटी रुपयांचा हा प्रकल्प असून, अल्प भूसंपादनात तो पूर्ण करण्याचे नियोजन आहे. सुरुवातीला सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी समृद्धी महामार्गावर प्रवेश आणि बाहेर पडण्यासाठीचा मार्ग सुरू करण्याच्या दृष्टीने दोनपदरी रस्ता तयार केला जाईल. त्यानंतर योग्य वेळी जमीन संपादित करून रस्त्याची रुंदी चारपदरी करण्याचे नियोजन आहे. दुसऱ्या प्रकल्पाच्या माध्यमातून नाशिक शहर ते पांढुर्ली दरम्यानचा रस्ताही विकसित करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनधारकांना समृद्धी महामार्गावर ये-जा करणे अधिक सोयीस्कर आणि सुकर होणार आहे.
Nashik : अंबड लिंक रोडवरील खड्डे आणि रस्त्याच्या दुरवस्थेमुळे घडलेल्या अपघातात ५४ वर्षीय व्यक्तीला जीव गमवावा लागलाय. चुंचाळे फाटा येथील मीना ...
समृद्धी महामार्ग नाशिकच्या जवळ येणार ?
सध्या नाशिककरांना समृद्धी महामार्गावर जाण्यासाठी इगतपुरी, भरवीर खुर्द आणि सिन्नर हे प्रमुख पर्याय उपलब्ध आहेत. इगतपुरी कनेक्टर नाशिकपासून सुमारे ४५ किलोमीटर, तर भरवीर खुर्द कनेक्टर सुमारे ४४ किलोमीटर अंतरावर आहे. सिन्नरमार्गेही समृद्धी महामार्ग गाठण्यासाठी सुमारे ४० किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. इगतपुरीमार्गे मुंबईकडे जाताना वाहनधारकांना घोटी टोल प्लाझासह समृद्धी महामार्गाचा स्वतंत्र टोल द्यावा लागतो. तर भरवीर खुर्दच्या मार्गावर ग्रामीण भागातील तुलनेने अरुंद रस्त्यामुळे प्रवासाचा वेळ वाढतो. नव्या पांढुर्ली कनेक्टरमुळे नाशिक शहरातून समृद्धी महामार्गावर पोहोचण्याचे अंतर जवळपास निम्म्याने कमी होण्याची अपेक्षा आहे.
दुहेरी भुर्दंडातूनही सुटका होणार ?
नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन या कनेक्टरसाठी सातत्याने पाठपुरावा करत होते. पांढुर्ली कनेक्टरमुळे मुंबई तसेच नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना समृद्धी महामार्गावर अधिक जलद प्रवेश मिळणार असून, प्रवासाचा वेळ आणि अंतर कमी होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळातही नाशिकच्या वाहतूक व्यवस्थेला या प्रकल्पाचा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. सोबतच टोलच्या दुहेरी भुर्दंडातूनही वाहनधारकांची सुटका होण्याची अपेक्षा आहे.






