Thursday, August 27, 2026

Jalgaon Crime : भीषण ! रेल्वे मार्गावर एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, हत्या की आत्महत्या ? गूढ वाढलं

Jalgaon Crime :  भीषण ! रेल्वे मार्गावर एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, हत्या की आत्महत्या ? गूढ वाढलं

Jalgaon Crime : जळगाव जिल्ह्यातील अमळनेर (Amalner) तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुवारी पहाटे एकाच कुटुंबातील पती-पत्नीसह त्यांच्या दोन मुलींचा टाकरखेडा येथे रेल्वे मार्गावर मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. एकाच वेळी अशाप्रकारे संपूर्ण कुटुंबच संपल्याने ग्रामस्थांना मोठा धक्का बसला असून टाकरखेडा (Takarkheda) परिसरात शोककळा पसरली आहे. ( Jalgaon Crime News )

नेमकं प्रकरण काय ?

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, टाकरखेडा Takarkheda) येथील सुनील अमृत भिल, त्याची पत्नी पार्वती भिल आणि दोन्ही मुली, हे पहाटेच्या सुमारास घरातून बाहेर पडले होते. त्यानंतर धरणगाव ते अमळनेर दरम्यानच्या रेल्वे मार्गावर चौघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली अन् सर्वांनाच धक्का बसला. मृतांमधील एका मुलीचे वय शालेय शिक्षणाच्या सुरुवातीच्या टप्प्यात तर दुसरी मुलगी अंगणवाडीमध्ये जात असल्याची माहिती समोर येत आहे. घडलेल्या घटनेबद्दल पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी अमळनेर पोलिसांना गुरुवारी पहाटे सुमारे ४.४० वाजता माहिती दिली. ( Jalgaon Crime News )

रेल्वे अधिकाऱ्यांकडून पोलिसांना माहिती

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी तातडीने पोलिसांचे पथक घटनास्थळी पाठवले. सहाय्यक गणेश अहिरे, हेडकॉन्स्टेबल संदेश पाटील, विजय भोई, योगेश बागुल आणि राहुल पाटील यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. दरम्यान, घडलेल्या प्रकारची माहिती मिळाल्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी एकच गर्दी केली. एकाच कुटुंबातील चौघांचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत होती. प्राथमिक माहितीनुसार, भिल कुटुंब पहाटेच्या सुमारास घरातून बाहेर पडले होते. त्यानंतर काही वेळातच रेल्वे प्रशासनाकडून पोलिसांना घटनेची माहिती मिळाली. मात्र कुटुंब नेमके कोणत्या परिस्थितीत घराबाहेर पडले आणि त्यानंतर काय घडले, या घटनेपूर्वी कुटुंबात काही कौटुंबिक किंवा अन्य प्रकारचा वाद होता का, या सर्वांची चौकशी आता पोलिसांकडून सुरु आहे. ( Jalgaon Crime News )

आत्महत्येचे नेमके कारण अस्पष्ट

दरम्यान, प्राथमिक चर्चेत कौटुंबिक कारणाचा उल्लेख होत असला तरी त्याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. कौटुंबिक परिस्थिती, आर्थिक अडचणी किंवा अन्य काही कारण होते का, यासह विविध शक्यता पोलिसांकडून तपासल्या जात आहेत. घटनेचे नेमके कारण अद्याप अधिकृतपणे समोर आलेले नाही. मात्र एकाच कुटुंबातील चार जणांचा एकाच घटनेत अशाप्रकारे मृत्यू झाल्याने टाकरखेडा गावावर शोककळा पसरली आहे. या घटनेने ग्रामस्थांना मोठा धक्का बसला असून, कुटुंबीय आणि नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, पोलिसांकडून घटनेचा सखोल तपास सुरू आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >