Thursday, August 27, 2026

Maharashtra politics : भाजप प्रवेशासाठी निघालेले उबाठा गटाचे नगरसेवक रातोरात शिंदेंच्या शिवसेनेत दाखल

Maharashtra politics : भाजप प्रवेशासाठी निघालेले उबाठा गटाचे नगरसेवक रातोरात शिंदेंच्या शिवसेनेत दाखल

- भाजप-शिवसेनेत राजकीय नाट्य; खासदार ओमराजेंकडून राणा पाटलांना धोबीपछाड

मुंबई : धाराशिव शहरात नगरसेवकांच्या फोडाफोडीच्या राजकारणावरून सत्ताधारी महायुतीमधील भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जोरदार राजकीय संघर्ष पाहायला मिळाला आहे. भाजप प्रवेशासाठी मुंबईच्या दिशेने निघालेल्या उबाठा गटाच्या नगरसेवकांनी वाटेतच 'यू-टर्न' घेत बुधवारी रात्री उशिरा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी अत्यंत गोपनीयरीत्या आखलेल्या रणनीतीमुळे राणा पाटील यांना शह मिळाल्याची चर्चा आहे.

धाराशिवमध्ये भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील यांच्या माध्यमातून उबाठा गटाच्या नगरसेवकांना पक्षात घेण्यासाठी 'ऑपरेशन लोटस २.०' राबविण्यात येत होते. या मोहिमेअंतर्गत उबाठा गटाचे नगरसेवक भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रवेश करण्यासाठी मुंबईकडे रवाना झाले होते. मात्र, हे नगरसेवक पुण्याच्या इंदापूरजवळ पोहोचताच राजकीय घडामोडींना वेग आला आणि या नगरसेवकांनी अचानक माघार घेत धाराशिव गाठले.

या संपूर्ण घटनेमागे शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांची रणनीती काम करत होती. धाराशिवमध्ये परतल्यानंतर ओमराजेंच्या माध्यमातून या सर्व नगरसेवकांना तातडीने ठाण्यात हलवण्यात आले आणि रात्री उशिरा उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश झाला. यापूर्वी कळंब नगर परिषदेतील नगरसेवकांना आपल्याकडे खेचत भाजपने 'ऑपरेशन लोटस' यशस्वी केले होते, मात्र आता ओमराजेंनी 'ऑपरेशन टायगर' राबवत राणा पाटील यांना शह दिला आहे. मात्र, या राजकीय उलथापालथीमुळे स्थानिक पातळीवर मित्रपक्ष असलेले भाजप आणि शिवसेना आमनेसामने आल्याचे चित्र असून, उर्वरित नगरसेवक नेमकी कोणती भूमिका घेतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा