- माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा; उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या पक्षाची होती योजना
मुंबई : "डिसेंबर २०१४ मध्येच तत्कालीन शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येऊन 'महाविकास आघाडी'च्या धर्तीवर सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव आला होता. मात्र हा प्रस्ताव आपण स्वतः तिथल्या तिथे फेटाळला होता", असा दावा माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी केला. (Prithviraj Chavan)
माध्यमांशी संवाद साधताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपला बाजूला ठेवून सरकार स्थापन करण्याचा हा प्रस्ताव होता. मात्र, त्यावेळी आपल्या पक्षाला शिवसेनेसोबत जाणे मान्य होणे शक्य नव्हते, त्यामुळे आपण तो प्रस्ताव स्वीकारला नाही. पुढे २०१९ मध्ये मात्र ही परिस्थिती बदलली आणि आपणच मविआचा प्रस्ताव पुढे केला, असे त्यांनी सांगितले. (Prithviraj Chavan)
दरम्यान, आगामी नाशिक कुंभमेळ्यासाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या ३५ हजार कोटी रुपयांच्या निधीरही पृथ्वीराज चव्हाण यांनी आक्षेप घेतला आहे. गेल्या कुंभमेळ्यात ३ ते साडेतीन हजार कोटी रुपयांचा खर्च झाला होता, मग आता ३५ हजार कोटींचे बजेट कसे काढले? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या प्रकल्पाचा कोणताही वैज्ञानिक अभ्यास किंवा 'प्रोजेक्ट रिपोर्ट' तयार करण्यात आलेला नाही. ६ कोटी लोक येतील असा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्षात येणाऱ्या लोकांचा भार गोदावरी नदी आणि पर्यावरणाला झेलेल का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला असून, कंत्राटदारांचे लांगूलचालन करण्यासाठी हा खटाटोप सुरू असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. (Prithviraj Chavan)






