मुंबई : राज्य सरकारच्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' अंतर्गत पात्र ठरलेल्या सुमारे १६ लाख ९४ हजार शेतकऱ्यांच्या पीक कर्ज खात्यात मंगळवारी, ४ ऑगस्ट रोजी एकाच वेळी सात हजार कोटी रुपये जमा केले जाणार आहेत. सहकार विभागाच्या या निर्णयामुळे थकीत कर्जदारांना मोठा दिलासा मिळणार असून त्यांचा पुन्हा नवीन पीक कर्ज घेण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
४६ वर्षीय महिला रुग्णाच्या गर्भाशयातून ५.५ किलो वजनाची काढली गाठ मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मानखुर्द येथील ४६ वर्षीय महिलेला गेल्या दोन वर्षांपासून ...
राज्य सरकारने ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत पीक कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांच्या मर्यादेत कर्जमाफी जाहीर केली आहे. या योजनेनुसार पहिल्या टप्प्यात दोन लाखांच्या आतील कर्जदार शेतकऱ्यांची यादी प्राप्तिकर विभागाकडे छाननीसाठी पाठवण्यात आली होती. यामध्ये प्राप्तिकर भरणारे ९४ हजार शेतकरी आढळून आल्याने त्यांना कर्जमाफीसाठी अपात्र ठरवण्यात आले आहे. तर उर्वरित १६ लाख ९४ हजार पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली असून, या शेतकऱ्यांच्या कर्ज खात्याचे आधार प्रमाणीकरण पूर्ण होताच रक्कम वर्ग करण्यात येत आहे.
या योजनेअंतर्गत नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन निधी देण्यात येत आहे. तसेच दोन लाखांपेक्षा अधिक कर्ज थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांनी दोन लाखांवरील उर्वरित रक्कम बँकेत भरल्यानंतर, 'एकवेळ समझोता' (वन टाईम सेटलमेंट) योजनेअंतर्गत त्यांच्या खात्यातही सरकार २ लाख रुपये जमा करणार आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी पात्र शेतकऱ्यांनी काळजी करू नये असे सांगत, या प्रक्रियेमुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचे स्पष्ट केले आहे.






