मुंबई : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या देशभरातील ४८ शिक्षकांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६ साठी निवड झाली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील चार शिक्षकांचा समावेश आहे. ५ सप्टेंबर रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण होणार आहे.
महाराष्ट्रातील चार मानकरी
डॉ. कविता नृसिंहराव गिट्टे - बीड : दिव्यांग, ऊसतोड कामगारांची मुले आणि वंचित विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काम. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अध्यापन आणि शैक्षणिक अडचणींवर मात करण्यावर भर.
कुंदा जयवंत बच्छाव - नाशिक : नाशिक मनपा शाळा क्रमांक १८चा दर्जा सुधारण्यासाठी ‘ज्ञानभिंती’, ‘आनंदवली शिक्षण कट्टा’ आणि अमेरिकेतील शाळांशी ‘ई-ट्विनिंग’सारखे अभिनव उपक्रम.
वैभव वसंतराव कुलकर्णी - लातूर : ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा, विज्ञान-तंत्रज्ञान आणि कौशल्याधारित शिक्षणावर भर. विद्यार्थ्यांनी विविध स्तरांवर उल्लेखनीय कामगिरी केली.
शिवप्रसाद अरविंद टिंगरे - सातारा : विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नेतृत्वगुण आणि देशसेवेची भावना रुजवण्यासाठी योगदान. NDA व विविध स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन.
तीन टप्प्यांत निवड
पुरस्कारासाठी जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय अशा तीन टप्प्यांत निवड प्रक्रिया झाली. १५ जून ते २० जुलैदरम्यान ऑनलाइन स्व-नामांकन मागवण्यात आले. नावीन्यपूर्ण अध्यापन, विद्यार्थ्यांची प्रगती, व्यक्तिमत्त्व विकास आणि शाळेच्या गुणवत्तावाढीसाठीचे प्रयत्न या निकषांवर अंतिम ४८ शिक्षकांची निवड करण्यात आली.
५ सप्टेंबरला पुरस्कार सोहळा
शिक्षक दिनानिमित्त विज्ञान भवनात होणाऱ्या समारंभात पुरस्कार प्रदान केले जातील. पुरस्कारप्राप्त शिक्षकांच्या कार्यावर आधारित लघुपटही यावेळी दाखवले जाणार असून कार्यक्रमाचे विविध माध्यमांवर थेट प्रक्षेपण केले जाणार आहे.






