Monday, July 6, 2026

Dombivli News : मुसळधार पावसात डोंबिवलीत नागरिक हैराण; पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत, चोरट्यांच्या टोळीची दहशत

Dombivli News : मुसळधार पावसात डोंबिवलीत नागरिक हैराण; पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत, चोरट्यांच्या टोळीची दहशत

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात गेल्या चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) जनजीवनावर मोठा परिणाम झाला आहे. अनेक भागांमध्ये रस्त्यांवर पाणी साचले असून काही ठिकाणी घरांमध्येही पाणी शिरल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. याशिवाय विविध भागांत झाडे कोसळल्याच्या घटनाही घडल्या आहेत.  (Kalyan News)

डोंबिवली पूर्वेतील एमआयडीसी निवासी परिसरात पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. येथे अनेक रस्ते पाण्याखाली गेले असून काही कंपन्या आणि घरांमध्येही पाणी शिरल्याची माहिती आहे. स्थानिक नागरिकांनी नालेसफाई वेळेत आणि योग्य प्रकारे न झाल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे महापालिका तसेच एमआयडीसी प्रशासनाविरोधात नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

दरम्यान, पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा गैरफायदा घेत चोरट्यांच्या टोळीने परिसरात धुमाकूळ घातल्याची माहिती समोर आली आहे. भर पावसात बंद घरांना लक्ष्य करत चोरीच्या घटना घडल्याचा दावा करण्यात आला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाच जणांची टोळी संशयास्पद हालचाली करताना दिसत असल्याचे सांगितले जात आहे. काही घरांमध्ये चोरी झाल्याचीही माहिती समोर आली आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या चोरट्यांकडे धारदार शस्त्रे होती. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी पोलिसांकडे तातडीने कारवाईची मागणी केली आहे.

या प्रकरणाची मानपाडा पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध सुरू आहे. चोरीच्या घटनांमध्ये सहभागी असलेल्या आरोपींना लवकरात लवकर अटक करून परिसरातील नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >