Sunday, July 5, 2026

Mankhurd : मानखुर्दमध्ये चाळीचा भाग कोसळला, पाच जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता

Mankhurd : मानखुर्दमध्ये चाळीचा भाग कोसळला, पाच जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता

मुंबई : मुंबईत सतत पडत असलेल्या पावसामुळे मानखुर्दमध्ये एक मोठी दुर्घटना झाली आहे. मुंबईच्या पूर्व उपनगरांतील मानखुर्दच्या जनता नगरमध्ये हनुमान मंदिराजवळ ही दुर्घटना झाली.

चाळ क्रमांक पाचचा काही भाग सततच्या पावसामुळे कोसळला. मानखुर्दमध्ये झालेल्या या दुर्घटनेत किमान पाच जण ढिगाऱ्यात अडकले असल्याची भीती व्यक्त होत आहे. घटनास्थळी मुंबई महापालिका, पोलीस आणि अग्निशमन दल मदतकार्यात गुंतले आहे. १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकाही पोहोचल्या आहेत. अद्याप कोणी जखमी किंवा मृत असल्याचे वृत्त आलेले नाही. मदतकार्य वेगाने सुरू आहे. पडझड झाल्यामुळे कोसळलेला चाळीचा ढिगारा उपसण्याचे काम सुरू आहे.

तळमजला अधिक तीन मजले अशा स्वरुपाची चाळ होती. या चाळीचा काही भाग कोसळला आहे. दुर्घटना होण्यामागचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी मदतकार्य पूर्ण होताच तज्ज्ञांचे पथक चौकशी करणार आहे.

शाळांना सोमवारी सुटी जाहीर

भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, पनवेल महापालिकेच्या हद्दीतील शाळांना सोमवार ६ जुलै २०२६ रोजी सुटी जाहीर केली आहे. मुसळधार पावसाची शक्यता असल्यामुळे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून शाळांना सुटी देण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व शासकीय, खासगी, महानगरपालिका शाळा तसेच महाविद्यालयांना ही सुटी लागू आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत हा निर्णय घेण्यात आला असून, पावसामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी घराबाहेर पडू नये, असे प्रशासनाने सांगितले आहे. शाळा, महाविद्यालयांना सुटी असली तरी शासकीय आणि खासगी कार्यालये सुरू राहणार आहेत. कर्मचाऱ्यांना नियमितपणे कामावर हजर राहावे लागणार आहे. मुंबईसह आसपासच्या शहरांमध्ये दिवसभर मुसळधार पावसासह जोरदार वारे वाहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे काही ठिकाणी झाडे कोसळण्याच्या आणि फांद्या तुटण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना विशेष सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावे. समुद्रकिनाऱ्यांपासून दूर राहावे. धबधबे, नदी, नाले, ओढे, विहिरी, तलाव येथे पोहण्यासाठी जाणे टाळावे; असे आवाहन प्रशासनाने नागरिकांना केले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >