Friday, July 3, 2026

Narendra Modi : अमरनाथ यात्रेनिमित्त पंतप्रधानांचे भाविकांना पत्र; सुरक्षित यात्रेसह 'पाच संकल्प' करण्याचे आवाहन

Narendra Modi : अमरनाथ यात्रेनिमित्त पंतप्रधानांचे भाविकांना पत्र; सुरक्षित यात्रेसह 'पाच संकल्प' करण्याचे आवाहन

नवी दिल्ली : पवित्र अमरनाथ यात्रेला प्रारंभ झाल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी देशभरातील भाविकांना उद्देशून विशेष पत्र लिहित शुभेच्छा दिल्या आहेत. बाबा बर्फानींचे दर्शन हे प्रत्येक शिवभक्तासाठी परमभाग्याचे असून अमरनाथ यात्रा ही केवळ धार्मिक श्रद्धेचे नव्हे, तर भारताच्या सांस्कृतिक ऐक्याचेही प्रतीक असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे.पंतप्रधानांनी भाविकांना सुरक्षित यात्रा करण्याचे, पर्यावरणाचे संरक्षण करण्याचे आणि स्थानिक नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. तसेच श्रद्धा, सेवा आणि राष्ट्रनिर्मितीचा संदेश अधिक प्रभावी करण्यासाठी पाच महत्त्वाचे संकल्प करण्याचेही त्यांनी सुचविले.(Narendra Modi)

पत्रात त्यांनी नमूद केले की, ज्येष्ठ पौर्णिमेच्या प्रथम पूजेनंतर सुरू होणाऱ्या या यात्रेसाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक सहभागी होतात. अमरनाथ धामाची यात्रा आध्यात्मिक ऊर्जा प्रदान करण्याबरोबरच विविध राज्ये, भाषा आणि संस्कृतींना एका श्रद्धेच्या धाग्यात बांधणारी असल्याचे त्यांनी म्हटले.यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी श्री अमरनाथजी श्राइन बोर्ड, जम्मू-काश्मीर प्रशासन, भारतीय सेना, केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ), जम्मू-काश्मीर पोलीस, भारत-तिबेट सीमा पोलीस दल (आयटीबीपी), सीमा सुरक्षा दल (बीएसएफ), राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी आणि स्वयंसेवक यांच्या योगदानाचेही पंतप्रधानांनी कौतुक केले.

'पाच संकल्प' करण्याचे आवाहन

पंतप्रधान मोदी यांनी भाविकांना यात्रा मार्गावर स्वच्छता राखणे आणि कचरा न टाकणे, प्रशासन व सुरक्षा यंत्रणांच्या सूचनांचे काटेकोर पालन करणे, प्रतिकूल हवामान लक्षात घेऊन आवश्यक ती खबरदारी घेणे, 'व्होकल फॉर लोकल' उपक्रमांतर्गत यात्रेवरील खर्चातील किमान १० टक्के रक्कम जम्मू-काश्मीरमधील स्थानिक उत्पादने खरेदीसाठी खर्च करणे, तसेच रक्षाबंधनाच्या निमित्ताने 'एक झाड आईच्या नावाने' अभियानात सहभागी होऊन वृक्षारोपण करणे आणि 'राष्ट्र प्रथम' या भावनेने कर्तव्य पार पाडण्याचे आवाहन केले.

पंतप्रधानांनी म्हटले की, अमरनाथ यात्रा (Amarnath Yatra) ही केवळ भगवान शिवांच्या दर्शनापुरती मर्यादित नसून सेवाभाव, सनातन परंपरा आणि राष्ट्रीय एकात्मतेचे जिवंत उदाहरण आहे. यात्रेदरम्यान स्थानिक नागरिक भाविकांचे आत्मीयतेने स्वागत करतात, तर देशभरातून आलेले भाविक लंगर आणि भंडाऱ्यांद्वारे निःस्वार्थ सेवा देतात. ही परंपरा भारतीय संस्कृतीतील 'सर्वे भवन्तु सुखिनः' या मूल्याला अधिक बळकट करते, असे त्यांनी नमूद केले.यात्रा सुरक्षित आणि सुरळीत पार पडण्यासाठी हवामानाशी संबंधित इशारे तसेच प्रशासनाने जारी केलेल्या सर्व सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करत, सुरक्षा दल आणि प्रशासन प्रत्येक भाविकाची यात्रा सुरक्षित करण्यासाठी कटिबद्ध असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.पत्राच्या शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाबा अमरनाथांच्या चरणी सर्व भाविकांच्या सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना व्यक्त केली. यंदाची अमरनाथ यात्रा श्रद्धा, सेवा, सांस्कृतिक ऐक्य आणि राष्ट्रभक्तीचा भव्य उत्सव ठरेल तसेच प्रत्येक भाविक सुरक्षितपणे आपल्या घरी परतेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा