Tuesday, August 11, 2026

Vande Mataram Law : ‘वंदे मातरम्’ला राष्ट्रगीताप्रमाणेच कायदेशीर संरक्षण, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मंजुरीने ऐतिहासिक विधेयकाचे कायद्यात रूपांतर

Vande Mataram Law : ‘वंदे मातरम्’ला राष्ट्रगीताप्रमाणेच कायदेशीर संरक्षण, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मंजुरीने ऐतिहासिक विधेयकाचे कायद्यात रूपांतर

नवी दिल्ली: राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’चा अवमान करणाऱ्यांवर आता कठोर कारवाई केली जाणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंगळवारी ‘राष्ट्रीय प्रतिष्ठा अवमान निवारण (सुधारणा) विधेयक २०२६’ ला मंजुरी दिली आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे आता राष्ट्रीय गीत असलेल्या ‘वंदे मातरम्’ला राष्ट्रगीत ‘जन-गण-मन’प्रमाणेच समान कायदेशीर संरक्षण प्राप्त झाले आहे. संसदेने गेल्या महिन्यात ‘राष्ट्रीय प्रतिष्ठा अवमान निवारण कायदा, १९७१’ मध्ये सुधारणा करणारे हे महत्त्वपूर्ण विधेयक बहुमताने मंजूर केले होते. राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर आता या विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाले असून संपूर्ण देशात हा नियम लागू झाला आहे.

कायद्यानुसार, ‘वंदे मातरम्’चे गायन रोखणे किंवा गायन चालू असताना त्यात अडथळा निर्माण करणे हा गंभीर गुन्हा मानला जाईल. असा गुन्हा करणाऱ्या व्यक्तीला ३ वर्षांपर्यंतचा कारावास, दंड, किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. : जर एखाद्या व्यक्तीने हा गुन्हा पुन्हा केला, तर त्याला किमान १ वर्षाच्या कारावासाची तरतूद करण्यात आली आहे. याआधी १९७१ च्या मूळ कायद्यात केवळ राष्ट्रगीत ‘जन-गण-मन’च्या अवमानाबाबतच शिक्षेची तरतूद होती. ‘वंदे मातरम्’ला राष्ट्रीय गीताचा दर्जा असूनही असा कोणताही थेट कायदेशीर आधार उपलब्ध नव्हता. हीच त्रुटी दूर करण्यासाठी केंद्र सरकारने कलम ३ मध्ये सुधारणा करून ‘वंदे मातरम्’चा यामध्ये समावेश केला आहे. ( Vande Mataram Bill)

विधेयकात २४ जानेवारी १९५० रोजी घटना समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी दिलेल्या ऐतिहासिक निर्णयाचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात बंकीमचंद्र चट्टोपाध्याय लिखित ‘वंदे मातरम्’ या गीताने अतुलनीय योगदान दिले होते. म्हणूनच, ‘वंदे मातरम्’ला राष्ट्रगीत ‘जन-गण-मन’सारखाच दर्जा आणि सन्मान दिला गेला पाहिजे, अशी भूमिका घटना समितीने मांडली होती. कायद्यातील या सुधारणेमुळे घटना समितीच्या भूमिकेला आज कायदेशीर बळ मिळाले आहे. ( Vande Mataram News)

यावर्षीच्या स्वातंत्र्यदिनी पहिल्यांदाच लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून ‘वंदे मातरम्’चे गायन केले जाणार आहे. अधिकृत कार्यक्रमांमध्ये ‘वंदे मातरम्’ची सर्व ६ कडवी गायली जातील. यासाठी ३ मिनिटे १० सेकंदांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. कोणत्याही शासकीय कार्यक्रमात राष्ट्रगीत (जन-गण-मन) आणि राष्ट्रीय गीत एकत्र वाजवले किंवा गायले जाणार असल्यास, ‘वंदे मातरम्’ प्रथम गायले जाईल. राष्ट्रीय गीत सुरू असताना उपस्थितांना सावध स्थितीत उभे राहणे बंधनकारक असेल. देशातील सर्व शाळांमध्ये दैनंदिन कामकाजाची सुरुवात ‘वंदे मातरम्’च्या समूहगायनाने करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >